चंद्रपूर जिल्ह्यातील 2 हजार 600 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

चंद्रपूर जिल्ह्यातील 2 हजार 600 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

मुंबई, दि. 20 : चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत असून चंद्रपूर, वरोरा व भद्रावती तालुक्यातील २ हजार ६०० नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. लष्कराचे एक पथक, एनडीआरएफचे एक पथक, एसडीआरएफच्या दोन तुकड्या व स्थानिक पथकाच्या सहाय्याने वर्धा नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.

नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्याची सध्याची पूर परिस्थिती आटोक्यात आहे. जिल्ह्यातील वैनगंगा नदी धोका पातळीच्यावर वाहत आहे तसेच वर्धा, प्राणहिता व इंद्रावती या नद्या इशारा पातळीच्यावर वाहत असून नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एक एसडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहेत.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या ठिकाणी मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली होती. आतापर्यंत ३९७ लोकांना १० निवारा केंद्रात सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात जून ते आतापर्यंत ११० महसूल मंडळापैकी ९५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तसेच जिल्ह्यात नागपूरचे एसडीआरएफचे एक पथक दाखल झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४ टीम व तालुका प्रशासन यांनी २ हजार २४७ लोकांना स्थलांतरित करून सुरक्षित स्थळी हलविले आहे.

कोंकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात ३० जुलैपर्यंत सकाळी सहा वाजतापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अवजड वाहनांची एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली असून, सायंकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

राज्यातील नुकसानीची सद्य:स्थ‍िती

राज्यात पुरामुळे २८ जिल्हे व २८९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरते निवारा केंद्र तयार करण्यात आले असून आतापर्यंत १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आतापर्यंत अतिवृष्टीमुळे १०९ नगरिकांनी आपला जीव गमावला आहे. तर १८९ प्राणी दगावले आहेत.पावसामुळे आतापर्यंत ४४ घरांचे पूर्णत: तर २०८६ घरांचे अशंत: नुकसान झालेले आहे.

राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १८ तुकड्या तैनात

मुंबई (कांजूरमार्ग १, घाटकोपर १) -२, पालघर -१, रायगड-१ महाड-१, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण -२, कोल्हापूर-२, सातारा-१, चंद्रपूर-१ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ तुकड्या तैनात आहेत. तर नांदेड-१, गडचिरोली -१, चंद्रपूर -२, यवतमाळ-१ अशा एकूण पाच राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी १२ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल देण्यात येत आहे.