‘जलशक्ती अभियान : कॅच द रेन’ बाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

‘जलशक्ती अभियान : कॅच द रेन’ बाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

चंद्रपूर, दि. 14 जून : पावसाचा प्रत्येक थेंब जतन करण्यासाठी केंद्र शासनाच्या जल संसाधन विभाग, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभाग तसेच राज्य शासनाच्या मृद व जनसंधारण विभागामार्फत ‘जलशक्ती अभियान : कॅच द रेन’ ही कालबध्द मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अभियानाचा कालावधी 29 मार्च 2022 ते 30 सप्टेंबर 2022 असा आहे.

याबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज (दि.14) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन या अभियानाचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिल कलोडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर आदी उपस्थित होते.

यावर्षीच्या अभियानाचे ब्रिदवाक्य ‘कॅच द रेन – व्हेअर ईट फॉल्स…व्हेन ईट फॉल्स’ असे असून सदर अभियान पाच उपक्रमावर आधारीत आहे. यात जलसंधारण आणि पावसाचे पाणी साठवण, पारंपरिक आणि इतर जलस्त्रोत तसेच मुख्य जलसाठ्यांचे नुतणीकरण, जल संरचनेचा पुनर्वापर आणि पुनर्भरण, पाणलोट क्षेत्र विकास करणे आणि सघन वनीकरण यांचा समावेश आहे. तसेच या अभियानांतर्गत जिल्ह्यातील विविध यंत्रणेमार्फत वृक्षलागवड, जनपुनर्भरण, विहीर पुनर्भरण, शोषखड्डे, विहीर खोलीकरण, बोअरवेल दुरुस्ती, सिमेंट नाला बांध मधून गाळ काढणे, खोल सलग समपातळी चर, पुनर्भरण खड्डे, शेततळे व इतर कामे करण्यात येणार आहे.

विविध यंत्रणांनी त्यांना दिलेली कामे त्वरीत पूर्ण करून पाण्याचा प्रत्येक थेंब साठविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन यावेळी जिल्हाधिका-यांनी केले.