मालमत्ता कर व इतर करांचा एकरकमी भरणा करणाऱ्यांना शास्तीत माफी; कोविड लसीच्या दोन्ही मात्रा अनिवार्य

मालमत्ता कर व इतर करांचा एकरकमी भरणा करणाऱ्यांना शास्तीत माफी; कोविड लसीच्या दोन्ही मात्रा अनिवार्य

 
मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

चंद्रपूर, ता. ७ : कोविड- १९ विषाणूचा प्रादुर्भाव पसरु नये, यासाठी शासनाकडून माहे मार्च २०२० पासून वेळोवेळी लॉकडाऊन करण्यात आले. त्या काळात व्यापार व व्यवसाय बंद असल्यामुळे व्यापारी वर्ग आणि समाजाचे घटक कामगार वर्ग यांना आर्थिक अडचण निर्माण झाल्यामुळे थकीत कराचा भरणा करता आला नाही. अशा घटकांना दिलासा देण्यासाठी १० जानेवारी ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत मालमत्ता कर व इतर करांचा एकरकमी भरणा करणाऱ्याना १०० टक्के शास्तीत माफी देण्यात येणार आहे. मात्र, ही सूट कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांनाच लागू राहील, असे मनपा प्रशासनाने जाहीर केले आहे.

सन २०२०-२१ व २०२१-२२ मध्ये शासनाकडून वेळोवेळी लॉकडाऊन सुरु होते. त्यामुळे शहरातील अनेक मालमत्ताधारकांनी आर्थिक अडचणीमुळे मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही. अशा आर्थिक संकटात शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी मालमत्ता करावरील शास्ती माफ करावी, असे निर्देश मनपाचे स्थायी समिती सभापती संदीप आवारी नुकतेच यांनी दिले होते.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ ची अनुसूची “ड” – प्रकरण ८, कराधन नियम ५१ अन्वये महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल यांनी आपल्या विशेषाधिकारांचा वापर करून सन २०२०-२१ पर्यंतचा थकीत मालमत्ता कर व इतर कर तसेच सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर व इतर करांचा दिनांक १० जानेवारी २०२२ ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांना शास्तीमध्ये १००% सूट देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मात्र या विशेष सुटीचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील सर्व १८ वर्षांवरील व्यक्तींचे कोविड लसीचे दोन डोस पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित मालमत्ताधारकांना ऑफलाईन व ऑनलाईन कराचा भरणा करताना कोविड लसीकरणाचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल, असे मनपा प्रशासनाने जाहीर केले आहे.

कोरोनाच्या ताळेबंदीमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले. आर्थिक टंचाई निर्माण झाली. त्यामुळे अनेकांना कराचा भरणा करता आला नाही. अशा नागरिकांना दिलासा देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले.

लसीच्या दोन्ही मात्रा  घेतलेल्या नागरिकांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा तिसऱ्या लाटेची तीव्रता सौम्य आहे, असे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. चंद्रपूर शहरातील सर्व पात्र व्यक्तीचे लसीचे डोस वाढविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिली.