वन्यप्राण्यांच्या धोक्यापासून वाचविण्याकरिता वन विभागातील कर्मचाऱ्यांना योग्य सुरक्षा देण्यात यावी :- राजु झोडे

वन्यप्राण्यांच्या धोक्यापासून वाचविण्याकरिता वन विभागातील कर्मचाऱ्यांना योग्य सुरक्षा देण्यात यावी :- राजु झोडे

वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा जिव जाणे अत्यंत दुर्दैवी घटना

बातमी संकलन-शंकर महाकाली

जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात अत्यंत दुर्दैवी घटना घडली.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत कोलारा वनपरिक्षेत्रातील पाणवठा क्रमांक ९७ जवळ अखिल भारतीय व्याघ्र प्रगणनेच्या पहिल्याच दिवशी दिनांक २०/११/२०२१ ला सकाळी ८.०० वाजता महिला वनरक्षक कु. स्वाती ढुमणे व त्यांचे मदतनीस यांचेवर वाघिणीने हल्ला केला. या हल्ल्यात वनसंरक्षक कुमारी स्वाती ढुमणे यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर मदतनीस हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना अत्यंत दुर्दैवी व क्लेशदायक असून वनविभागाने पुरेशी सुरक्षा व पुरेसं मनुष्यबळ न दिल्यामुळे घडली आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते राजु झोडे यांनी केला.
अखिल भारतीय व्याघ्र प्रगणनेला सुरुवात झाली असून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना अतिसंवेदनशील जंगलात व्याघ्र गणनेलासाठी पाठविले जात आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात मोठ्या प्रमाणात वाघाची व इतर हिंस्र पशूंची वाढ झालेली आहे. वनविभागाचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. परंतु वन विभाग व वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा देण्यास टाळाटाळ करतात. यामुळेच असे प्रकार घडत असतात. जंगलात जाणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना वन विभागाने किमान पुरेसा मनुष्यबळ म्हणून पाच मदतनीस, सुरक्षेच्या दृष्टीने जीवाला हानी न होणारी उपकरणे जसे की, स्मार्ट स्टिक, कुकरी इत्यादी. वन्यप्राण्यांच्या भ्रमण वेळेस कर्मचाऱ्यांना जंगलात न जाऊ देणे अशा उपाययोजना तात्काळ कराव्या अशी मागणी वंचितचे नेते राजू झोडे यांनी मुख्य वनसंरक्षक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
जोपर्यंत वन विभाग वरील सर्व मूलभूत सुविधा पुरवणार नाही तोपर्यंत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्याघ्र प्रगणनेत सहभागी होऊ नये असे आवाहन वन कर्मचाऱ्यांना राजू झोडे यांनी केले. निवेदन देताना वंचित चे नेते राजु झोडे, रविभाऊ तेलतुमडे, नितीन कोसनकर, अक्षय लोहकरे, सिध्दांत पुणेकर तथा अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.