स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन खरेदीबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन खरेदीबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 27 सप्टेंबर: सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभागाच्या  2 जून 2004 च्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरीता सबळीकरण व स्वाभिमान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य  विभागाचे  शासन निर्णय  दि. 14 ऑगस्ट 2018  अन्वये सुधारणा करण्यात आली आहे.
योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या दारिद्ररेषेखालील भूमिहीन कुटुंबांना कायमचे उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे तसेच त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा, यासाठी त्यांना कसण्याकरीता चार एकर जिरायती किंवा दोन एकर बागायती जमीन खरेदी करून उपलब्ध करून द्यावयाची आहे. जिल्ह्यातील गैरआदिवासी कुटुंबाकडून शेतजमीन खरेदी करावयाची असल्याने विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी सदर विक्री प्रस्ताव सादर करावे, असे समाजकल्याण कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
जिरायत जमीन चार एकर व बागायत जमीन दोन एकर विक्री करण्यास तयार असल्यास संमती पत्रासह पटवारी साझानिहाय अर्ज, जमिनीचे दर हे प्रचलित शासकीय दरानुसार निश्चित करण्यात येतील किंवा वाटाघाटी करून जिल्हास्तरीय समितीद्वारे मूल्य निश्चित करण्यात येईल.
जमीन विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांनी, अर्जासोबत जमिनीचा 7/12, गाव नमुना आठ, परिसरातील प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा सेवा सोसायटीची कुठल्याही प्रकारची थकबाकी किंवा कर्ज नसल्याचे नाहरकत प्रमाणपत्र, अर्जदाराचे कुटुंबातील व्यक्तींचे जमीन विकण्यासंबंधी नाहरकत व संमती प्रमाणपत्र, विक्रीच्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याचे मोजणी विभागाचे टाचण व नकाशासह अहवाल, शेतजमीन विक्री प्रस्ताव समितीने खरेदी करणे बंधनकारक असणार नाही. जमिनीच्या खरेदी प्रक्रियेमुळे कोणतीही नुकसानभरपाई मागणार नसल्याबाबत तसेच जमिनीबाबत कोणत्याही न्यायालयामध्ये वाद सुरू नसल्याचे संबंधित शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचे 100 रुपयाच्या स्टॅम्पपेपरवर शपथपत्र व हमीपत्र जोडण्यात यावे.
सदर विक्री प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत पाठवावे, प्रत्यक्षरीत्या आणून द्यावे किंवा दि. 15 ऑक्टोंबर 2021 पर्यंत कार्यालयामध्ये संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.