100 दिवसांत 40 हजार शोषखड्डे निर्माण करण्याचा मानस – सीईओ डॉ. मिताली सेठी

100 दिवसांत 40 हजार शोषखड्डे निर्माण करण्याचा मानस – सीईओ डॉ. मिताली सेठी

Ø शोषखड्डे निर्मितीकरीता स्थायित्व व सुजलाम अभियान

चंद्रपूर, दि. 16 सप्टेंबर : भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हयामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत पुढील 100 दिवसांत हागणदारीमुक्त शाश्वतता टिकविण्यासाठी चंद्रपूर जिल्हयात स्थायित्व व सुजलाम अभियान राबविण्यात येणार आहे. 100 दिवसांच्या या अभियान कालावधी जिल्ह्यात 40 हजार शोषखड्डे निर्माण करण्याचा मानस असून प्रत्येक गावात जास्तीत जास्त शोषखड्डे निर्माण करावे, असे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले आहे.
लोकसहभागाच्या माध्यमातून सामुदायिक स्तरावर हागणदारीमुक्त शाश्वततेचे परिणाम अधिक प्रभावीपणे साध्य करण्यासाठी  आणि ग्रामीण भागात  शोषखड्यांच्या निर्मितीतून सांडपाणी व्यवस्थापन करणे, याबाबींचा समावेश आहे.  जिल्हयात अभियान कालावधीत किमान 40 हजार शोषखड्डे तयार करण्याचे लक्ष निश्चित करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पंचायत समितीनिहाय  किमान 3 हजार शोषखड्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
  शोषखड्डयांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर करावा. तसेच 100 दिवसांचा आराखडा प्रत्येक ग्रामपंचायत तयार करणार आहे. नादुरुस्त शौचालयांची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे. नादुरुस्त शौचालय दुरुस्त करण्यासाठी कुटुंबांची निवड करावी. तसेच सर्व नवीन कुटुंबांकडे शौचालय असल्याबाबतची खात्री करावी. सदर अभियानाबाबत लोकांना माहिती देण्यासाठी गावस्तरावर सभा, गटचर्चेच्या माध्यमातून अभियानाची जनजागृती करण्यात येणार आहे.
अभियानाचे जिल्हास्तरावरून संनियंत्रण करण्यासाठी जिल्हा कक्ष आणि विविध विभागांचे खाते प्रमुख यांच्या क्षेत्रीय भेटी होणार आहेत. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 मार्गदर्शिकेप्रमाणे हागणदारीमुक्त शाश्वतता आणि शोषखडयांचे बांधकाम यासाठी लागणारा निधी 15 वा वित्त आयोग, मनरेगा किंवा स्वच्छ भारत मिशन यांच्या माध्यमातून उपलब्ध केला जाईल. याशिवाय गावस्तरावर श्रमदान व लोकसहभागाची मोहिम राबवून शोषखड्डे निर्माण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे.
पूर्ण झालेल्या शोषखडयांची ( वैयक्तिकस्तर व सार्वजनिक स्तर ) माहिती स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत उपलब्ध असलेल्या एसबीएम – 2.0 मोबाईल अॅप्लीकेशन मधून नोंदीत करावी. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतींने पाठपुरावा करून 100 दिवसांचे स्थायित्व व सुजलाम अभियान यशस्वी होईल, यादृष्टीने तात्काळ कार्यावाही करण्याच्या सुचना सर्व गटविकास आधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
गावस्तरावर उघड्यावरील सांडपाण्याची मोठी समस्या असल्यामुळे विविध आजारांना बळी पडावे लागते. यासाठी प्रत्येक घरी शोषखड्डा तयार करणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हयात 100 दिवसांचे स्थायित्व व सुजलाम अभियान अंतर्गत जिल्हयात 40 हजार शोषखडे निर्मिती करणार असून उद्दिष्टापेक्षा जास्त शोषखड्यांची कामे जिल्ह्यातील प्रत्येक गावात करावी.- डॉ. मिताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी. जि.प.चंद्रपुर .