दिव्यांग सक्षमीकरण विभागासाठी लवकरच नियमित भरती प्रक्रिया – मंत्री अतुल सावे
सुधारित आकृतीबंधास मंजुरी
मुंबई, दि.25 : राज्यातील दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या सुधारित आकृतीबंधास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. नियमित भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य शशिकांत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य प्रविण दरेकर, संजय केनेकर यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
मंत्री अतुल सावे म्हणाले, विभागाचे सेवाप्रवेश नियम अंतिम टप्प्यात आहेत. नियम तयार झाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियमित पदभरती प्रक्रिया राबविण्यात येईल. सध्या विभागासाठी एकूण २१०५ पदांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये मंत्रालयीन स्तरावर ६७ पदे, तर आयुक्तालय व जिल्हास्तरावर १४०२ नियमित आणि ६३६ बाह्यस्त्रोतावरील पदांचा समावेश आहे.
10 जानेवारी 2025 रोजी पदे प्रतिनियुक्तीने भरण्याची कार्यवाही करण्यात आली. मात्र पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने गट-ब व गट-क अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आणि 1 मे 2025 पासून 13 जिल्ह्यांत कार्यालये सुरू करण्यात आली.
त्यानंतर 25 ऑगस्ट 2025 च्या निर्णयानुसार गट-अ व गट-ब अधिकाऱ्यांकडे जबाबदारी देण्यात येऊन 1 सप्टेंबर 2025 पासून सर्व 36 जिल्ह्यांत कार्यालये कार्यान्वित झाली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू असल्याचे मंत्री अतुल सावे यांनी यावेळी स्पष्ट केले.







