पुरामुळे ब्रम्हपुरी,सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा…

पुरामुळे ब्रम्हपुरी,सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी यांना निर्देश

चंद्रपूर,दि.१७ – सततच्या पावसामुळे आणि गोसीखुर्द धरणातील  पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीला पूर आला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे ब्रम्हपुरी आणि सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, असे आदेश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

वैनगंगा नदीच्या पुरामुळे धान,कापूस व सोयाबीन ही  पिके गेल्या तीन दिवसांपासून पाण्याखाली आहे. ब्रह्मपुरी व सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. पुरामुळे ब्रम्हपुरी आणि सावली तालुक्यातील काही गावात पाणी शिरल्याने घरांचेही नुकसान झालेली आहे.

त्यामुळे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पंचनाम्याच्या आधारे संपूर्ण अहवाल सादर करावा असे निर्देशही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिले आहेत.