– सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
मुंबई, दि. 28: सांस्कृतिक कार्य विभागामार्फत येत्या काळात भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली त्यानिमित्ताने ‘आजादी का अमृत महोत्सव‘ आणि महाराष्ट्र राज्य स्थापनेला 60 वर्षे होऊन गेली त्यानिमित्ताने ‘हिरक महोत्सव‘ या महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे. या कार्यक्रमाची रुपरेषा आखताना कोविड नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आजादी का अमृत महोत्सव आणि महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हिरक महोत्सव या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, फिल्मिसिटीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे, उपसचिव विलास थोरात व अन्य अधिकारी उपस्थित होते.
श्री.देशमुख म्हणाले की, या दोन्ही महोत्सवाचे आयोजन करीत असताना सर्वसमावेशक अशा कार्यक्रमांची आखणी करण्यात यावी. तसेच हे महोत्सव कशा पध्दतीने आयोजित करण्यात यावेत, याबाबत नेमक्या काय संकल्पना असतील याबाबत बैठकांचे नियोजन करुन एक आराखडा तयार करण्यात यावा. या कार्यक्रमांचे आयोजन करीत असताना कोविडचा धोका अजून कायम असल्याने कोविड सुरक्षा नियमावलीचे पालन करण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.