महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यात २४ तासांमध्ये सरासरी १३६ मि.मी. पाऊस

महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यात २४ तासांमध्ये सरासरी १३६ मि.मी. पाऊस

मुंबई, दि. 18 : राज्यात वर्धा जिल्ह्यात २४ तासांमध्ये सरासरी १३६ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली आहे.

कोंकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात १५.९ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळी वरून वाहत आहे. वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात हा दिनांक ३०.०७.२०२२ पर्यंत सकाळी ०६ वा. पासून ते सायंकाळी ०७ वा. पर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आलो असून, सायंकाळी ७ वा. ते सकाळी ६ वा. पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच राजापूर कोल्हापूर यांना जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे.

नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये ११३ मिमी एवढा सरासरी पाऊस झाला असून जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत तर गोदावरी नदी व इंद्रावती नदी या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. या नद्या तुडुंब भरल्याने अनेक मार्ग खंडित झाले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या १० हजार ६०६ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी ३५ मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत. लक्ष्मी बॅरेज (मेडीगडा) चे सर्व ८५ दरवाजे उघडले आहेत.

गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वर्धा जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये १३६.४ मिमी. एवढा सरासरी पाऊस झाला. जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या बचावाकरिता एनडीआरएफ (NDRF) टीम व दोन एसडीआरएफ (SDRF)च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

राज्यातील नुकसानीची सद्य:स्थ‍िती

राज्यात ७३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून आत्ता पर्यंत ११ हजार ८३६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आत्ता पर्यंत अति वृष्टीमुळे १०५ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर १८९ प्राणी दगावले आहेत.

राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या तैनात

मुंबई (कांजूरमार्ग १, घाटकोपर १) -२, पालघर -१,रायगड- महाड- १, ठाणे-२,रत्नागिरी-चिपळूण -२, कोल्हापूर-२,सातारा-१,सिंधुदुर्ग-१, गडचिरोली -१ शा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तर नांदेड-१, गडचिरोली -१ ,वर्धा-२ अशा एकूण चार राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कायमस्वरूपी ७ तुकड्या

मुंबई -३, पुणे-२ अशा एकूण ५ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे-२, अशा एकूण २ टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या कायमस्वरूपी तुकड्या आहेत.

राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी १२ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात येत आहे.