अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना गहू, तांदूळ व साखरेचे नियतन व वाटप

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना गहू, तांदूळ व साखरेचे नियतन व वाटप

गडचिरोली, : गडचिरोली जिल्हयातील सर्व रेशनकार्डधारकांना सुचित करण्यात येते की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत माहे मार्च 2023 या महिन्याकरीता अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना गहू, तांदुळ व साखरेचे नियतन व वाटप परिमाण पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे. रु.3/- प्रतिकिलो तांदूळ, रु.2/- प्रतिकिलो गहू व रु.1/- प्रतिकिलो भरडधान्य या दराने वितरीत करण्यात येणारे अनुज्ञेय असलेले अन्नधान्य दिनांक 01.01.2023 ते दिनांक 31.12.2023 पर्यंत एक वर्षाच्या कालावधीकरिता अनुज्ञेय असलेले अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना मोफत वितरीत करावयाचे आहे. नियतनाचा महिना कोणताही असला तरीही सदर अन्नधान्य दि.01.01.2023 पासून मोफत वितरीत करण्याबाबतचे शासन निर्देश प्राप्त असून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना गहू, तांदूळ व साखरेचे नियतन व वाटप परिमाण खालील प्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रती शिधापत्रिका 30 किलो तांदुळ, 5 किलो गहू, साखर 20 रुपये किलोप्रमाणे 1 किलो. शिधाजिन्नस संच 100 (प्रतीसंच रुपये), प्राधान्य कुटुंब लाभार्थीना प्रती व्यक्ती 4 किलो तांदुळ, 1 किलो गहू, शिधाजिन्नस संच 100 (प्रतीसंच रुपये) असेल.

जिल्ह्यातील रास्तभाव दुकानामार्फतीने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना गुढीपाडवा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे. नियमित अन्नधान्याव्यतिरीक्त प्रति शिधापत्रिका १ किलो रवा, १ किलो चणादाळ, १ किलो साखर व १ लिटर पामतेल या ४ शिधाजिन्नस संचाचे माहे मार्च 2023 या महिन्याकरीता ई-पॉस प्रणालीद्वारे रु.100/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने वाटप करण्यात येत आहे.

तरी सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना सुचित करण्यात येत की, त्यांना नेमून दिलेल्या रास्तभाव धान्य दुकानात जावून आपले शिधापत्रिकेवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील माहे मार्च 2023 महिन्यातील नियमित देय असलेल्या गहू व तांदूळ अन्नधान्याची “मोफत” उचल करावी. व धान्य घेतेवेळी POS मशीन मधून निघणारी पावतीवर रास्तभाव दुकानदाराकडून घ्यावी. व सोबतच नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त “आनंदाचा शिधा” रु.100/- प्रतिसंचची उचल करावी. दुकानात एकाच वेळी गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे. असे जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.