बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क

बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क


भंडारा, दि. 29 : अक्षयतृतीया हा महत्वाचा मुहूर्त असल्यामुळे या शुभ मुहूर्तावर सामुदायिक तसेच एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यावेळी बालविवाह सुध्दा मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर किंवा इतर वेळेस होत असलेल्या विवाह समारंभात बालविवाह होणार नाही याकरीता प्रत्येक सुजाण नागरिकांनी खबरदारी घेतली पाहिजे. 18 वर्षाच्या आत मुलीचे लग्न व 21 वर्षाच्या आत मुलाचे लग्न लावणे कायद्याने गुन्हा आहे. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्याअनुषंगाने बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

विवाहाकरिता मुलीच्या लग्नाचे वय 18 वर्षे पूर्ण व मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण असावीत. असे असले तरीही अनेक बालविवाह होत असल्याने त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 च्या अधिसूचनेनुसार ग्रामीण स्तरावर ग्रामसेवक तर शहरी भागाकरिता बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांना बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.

बालविवाह आपल्या गावात होत असल्यास तसेच बालविवाहाबाबत माहिती प्राप्त होताच जिल्हा महिला बाल विकास कार्यालयाचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे (9309110897), संरक्षण अधिकारी शिल्पा वंजारी (8275288904), कायदा व परिविक्षा अधिकारी प्रियंका पशिने (7743982479) तसेच चाईल्ड लाईन (1098 टोल फ्री क्रमांक) या भ्रमणध्वनीवर माहिती देण्यात यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर यांनी केले आहे.