थकित पाणीपट्टी भरा, व्याजातून सुट मिळवा Ø महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अभय योजना

थकित पाणीपट्टी भरा, व्याजातून सुट मिळवा

Ø महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अभय योजना

चंद्रपूर, दि. २१ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, चंद्रपूर मार्फत बल्लारपूर जि. चंद्रपूर व अहेरी जि. गडचिरोली येथील पाणी पुरवठा योजना राबविली जात आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी बहूतांश ग्राहकांनी अद्यापही थकीत पाणी पट्टी भरलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर फार मोठी थकबाकी वाढलेली आहे. थकबाकीदार ग्राहकांची रक्कम शुन्यावर आणण्याकरीता मजीप्रा ने १ फेब्रुवारी २०२२ पासून अभय योजना अंमलात आणली असून त्या अनुषंगाने ग्राहकांकडे पाणीपट्टी थकीत असलेल्या रक्कमेपैकी मुद्दल रक्कम एकाचवेळी ग्राहकांनी भरल्यास त्यांच्यावर लावण्यात आलेले व्याज १०० टक्के माफ केले जाणार आहे. बल्लारपूर अंतर्गत एकूण ग्राहक १४२०९ एकूण थकबाकीदार ७१९१ आहेत. माहे जानेवारी २०२३ पर्यंत २६४४ ग्राहक यांनी भाग घेतला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता विनोद उध्दरवार यांनी दिली.

 

या योजनेत भाग घेण्याची मुदत ३० एप्रील २०२२ पर्यंत होती. पण ग्राहकांना थोडा वेळ मिळावा, याकरीता मजीप्राने पुन्हा एक पाऊल पुढे टाकत लोकहितास्तव ३१ मार्च २०२३ पर्यंत अभय योजनेला मुदतवाढ दिली आहे. थकबाकीदार असलेल्या ग्राहकांनी या योजनेत भाग घेण्याचे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता विनोद उध्दरवार, उपविभागीय अभियंता सतिश गोर्लावार यांनी केले आहे.

 

… तर नळ जोडणी खंडीत करणार

 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने सर्वांना पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी संबंधीत ग्राहकांना पाणीपट्टी भरणे अनिवार्य आहे. पण अनेकांनी पाणीपट्टीचा भरणा केलेला नाही. यामुळे लाखोंची थकबाकी वाढली आहे. यावर उपाय म्हणून अभय योजना २०२२ ला मुदतवाढ दिली आहे. जे ग्राहक ३१ मार्च २०२३ पर्यंत अभय योजनेचा लाभ घेणार नाहीत, त्यांची नळ जोडणी पुर्व सुचना न देता खंडीत करण्याचा इशारा मजीप्राने दिला आहे.