तांदूळ जास्त वेळ पाण्यात भिजत ठेवल्यास आरोग्यासाठी नुकसान की फायदे..
अनेक गृहिणी वेळ वाचवण्यासाठी तांदूळ फक्त धुतात आणि लगेच कुकरला लावतात.
भारतीय आहारात तांदळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. डोशापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत तांदूळ हा मुख्य घटक असतो. मात्र, आजच्या धावपळीच्या युगात अनेकजण तांदूळ न भिजवता थेट शिजवतात. आपल्या पूर्वजांच्या काळात तांदूळ किमान अर्धा तास भिजत घातले जायचे. ही केवळ सवय नसून त्यामागे मोठे आरोग्यदायी कारण दडलेले आहे. तांदूळ न भिजवता खाल्ल्यास त्याचे फायदे मिळण्याऐवजी शरीराला नुकसान होऊ शकते. तेच आपण आज पाहाणार आहोत. त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम आपण जाणून घेणार आहोत.
काय आहे वैज्ञानिक कारण?
तांदळामध्ये ‘फायटिक ॲसिड’ नावाचा घटक असतो. हे ॲसिड शरीराला लोह (Iron), कॅल्शियम आणि झिंक यांसारखी आवश्यक खनिजे शोषून घेण्यापासून रोखते. जेव्हा आपण तांदूळ पाण्यात भिजवतो, तेव्हा या ॲसिडची पातळी कमी होते. यामुळे शरीर अन्नातील पोषक तत्वे सहज शोषून घेऊ शकते. विशेषतः मुले, महिला आणि वृद्धांसाठी ही पद्धत हाडे मजबूत करण्यासाठी आणि ॲनिमियासारख्या आजारांपासून वाचण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे तांदूळ हा पाण्यात भिजवल्यानंतर शिजवणे अधिक योग्य ठरते.







