नवरात्र आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन: महावितरणच्या सुलभ वीज जोडणीने उत्सव करा सुरक्षित!
महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन या दोन्ही उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. लाखो भाविक आणि धम्म बांधव या उत्सवांमध्ये सहभागी होतात आणि संपूर्ण वातावरण उत्साह, श्रद्धा आणि आनंदाने भारलेलं असतं. याच आनंदाला कोणतीही बाधा येऊ नये, यासाठी महावितरणने सार्वजनिक उत्सव मंडळांसाठी तात्पुरती वीज जोडणी केवळ घरगुती दरात उपलब्ध करून दिली
सुरक्षिततेची पहिली पायरी: अधिकृत वीज जोडणी:
उत्सवातील रोषणाई, आकर्षक देखावे, मंडप, महाप्रसाद आणि इतर कार्यक्रमांसाठी लागणारी वीज व्यवस्था फक्त अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेतली पाहिजे. बेकायदेशीर आणि अनधिकृत वीज जोडण्यांमुळे शॉर्ट सर्किट किंवा इतर गंभीर अपघात होण्याचा धोका असतो. म्हणूनच, सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करता अर्ज करताच मंडळांना तात्पुरती वीज जोडणी दिली जाईल. असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अशी घ्या काळजी:
मंडपातील विजेचे वायरिंग अत्यंत व्यवस्थित आणि प्रमाणित असावे. मीटर केबिनमध्ये जाण्याची परवानगी केवळ अधिकृत आणि प्रशिक्षित व्यक्तीलाच द्या. वीज जोडण्यांसाठी नेहमी दर्जेदार वायर आणि स्विच वापरा. आपत्कालीन परिस्थितीत संपूर्ण मंडपाचा वीजपुरवठा एकाच स्विचने खंडित करण्याची सोय असावी. तुटलेल्या वायर जोडण्यासाठी केवळ दर्जेदार इन्सुलेशन टेपचाच वापर करा. मीटर आणि स्विच जवळचा रस्ता नेहमी मोकळा ठेवावा, जेणेकरून गरज पडल्यास त्वरित पोहोचता येईल. मंजूर झालेल्या भारापेक्षा मंडपातील विजेचा वापर जास्त होणार नाही याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.
मदत नेहमीच उपलब्ध:
आणीबाणीच्या परिस्थितीत त्वरित मदतीसाठी महावितरणने 24 तास उपलब्ध असलेले टोल-फ्री क्रमांक दिले आहेत, 1912, 1800-233-3435. 1800-212-3435 किंवा 022-50897100 या क्रमांकावर मिस कॉल देऊनही संपर्क साधू शकता. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक महावितरण अभियंता आणि ‘जनमित्रांचे’ मोबाईल क्रमांक जवळ ठेवावे, असं आवाहनही करण्यात आलं आहे
अनामत रक्कम: सोपी प्रक्रिया, त्वरित परतावा:
तात्पुरत्या वीज जोडणीसाठी मंडळांना त्यांच्या मंजूर वीजभाराप्रमाणे अनामत रक्कम भरावी लागेल. ही रक्कम ऑनलाईन भरल्यास, उत्सव संपल्यानंतर वीजबिलाची रक्कम वजा करून उरलेली रक्कम विनाविलंब परत केली जाईल. यामुळे रक्कम परत मिळवण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही आणि मंडळाची प्रक्रिया अधिक सुलभ होईल.
महावितरणच्या या पुढाकाराने यंदाचा उत्सव सुरक्षित आणि आनंददायी करण्यासाठी सर्व मिळून सुरक्षिततेचा संकल्प करण्याचे आवाहन देखील महावितरणने केले आहे.