पावसाळ्यात विजेच्या धोक्यांपासून सुरक्षित राहा: महावितरणचं आवाहन!
नागपूर, 7 जुलै 2025: पावसाळा सुरू झाला की निसर्ग हिरवाईने नटतो, वातावरण आल्हाददायक होतं. पण यासोबतच येते विजेच्या अपघातांची शक्यता! वीज डोळ्यांना दिसत नसली तरी तिचे परिणाम जीवघेणे ठरू शकतात. त्यामुळेच, आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी, महावितरण आपल्याला योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करत आहे.
या पावसाळ्यात, विजेच्या धोक्यांपासून स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना वाचवण्यासाठी खालील महत्त्वाचे नियम पाळा:
घरात घ्यायची काळजी: सुरक्षिततेची पहिली पायरी!
आपलं घर म्हणजे आपलं सुरक्षित ठिकाण. पण पावसाळ्यात इथेही वीज धोक्याची घंटा वाजवू शकते. त्यामुळे विजेची उपकरणे, स्विचबोर्ड किंवा भिंती ओल्या असतील तर त्यांना अजिबात हात लावू नका. ओलसर हातांनी उपकरणे वापरणं टाळा. खिडक्या आणि बाल्कनीपासून विजेची उपकरणे दूर ठेवा. तुमच्या घरातील मीटरजवळ पाणी झिरपत असल्यास, तात्काळ मेन स्विच बंद करा आणि लगेच महावितरणला कळवा. मेन स्विचमध्ये चुकूनही तांब्याची तार वापरू नका. त्याऐवजी, वीजभाराला साजेसं अॅल्युमिनियम अलॉयचं विशिष्ट धातूचं फ्यूज वायर वापरा. यामुळे शॉर्टसर्किट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होईल आणि मोठा धोका टळेल. वायरिंगची तपासणी: तुमच्या घरातील वायरिंग जुनी झाली असेल तर त्वरित अधिकृत परवानाधारक कंत्राटदाराकडून ती तपासून घ्या. जुनी वायरिंग अपघातांना आमंत्रण देऊ शकते.
याशिवाय, वीजजोडणीसाठी नेहमी आयएसआय प्रमाणित साहित्यच वापरा. यात कोणतीही तडजोड नको! आपल्या घरातील सर्व विद्युत उपकरणांचे अर्थिंग योग्य असल्याची खात्री करा. मिक्सर, हिटर, गिझर यांसारख्या उपकरणांसाठी थ्री-पिन सॉकेट वापरा, कारण त्यात अर्थिंगची व्यवस्था असते. भिंत, लोखंडी पत्रा, फ्रिज, टीव्ही, संगणक किंवा पाण्याचे नळ यांना हात लावल्यावर तुम्हाला झिणझिण्या जाणवत आहेत का? हे धोक्याचं लक्षण आहे! तात्काळ तुमच्या वायरिंगची तपासणी करून घ्या. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ओलसर लोखंडी पाईप किंवा पाण्याच्या पंपाला स्पर्श करण्यापूर्वी कोरड्या रबरी/प्लॅस्टिकच्या चपला वापरा. खराब वायरिंग बदला: जुनी, खराब झालेली वायरिंग तात्काळ बदलून घ्या. आकाशात विजा चमकत असतील तर विद्युत उपकरणे बंद करून त्यांचे प्लग सॉकेटमधून काढून टाका.आपल्या घरामध्ये ‘ईएलसीबी’ ‘आरसीसीबी’ किंवा ‘एमसिबी’ सारखे सर्किट ब्रेकर बसवून घ्या. हे उपकरणं जास्त वीज वापर, शॉर्टसर्किट किंवा अर्थ फॉल्ट झाल्यास वीजप्रवाह खंडित करतात आणि तुम्हाला सुरक्षित ठेवतात. वायरची जोडणी करताना ती तुकड्या-तुकड्यांमध्ये जोडू नका. जोडणी करावी लागल्यास चांगल्या इन्सुलेशन टेपचा वापर करा. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नका.असे आवाहन महावितरणने केले आहे.
सार्वजनिक वीज यंत्रणेपासून सावध राहा: जीवाला धोका टाळा!
घराबाहेरही विजेचे धोके दडून असतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वादळामुळे तुटलेल्या किंवा झुकलेल्या वीजतारा, खांब, रोहित्राचे कुंपण, फ्यूज बॉक्स यांसारख्या गोष्टींपासून सुरक्षित अंतर राखा. तुटलेल्या तारांना अजिबात हात लावू नका किंवा त्या हटवण्याचा प्रयत्न करू नका. विजेच्या खांबांना किंवा स्टे वायरला जनावरे बांधू नका, दुचाकी टेकवू नका किंवा कपडे वाळत घालू नका. कपडे वाळवण्यासाठी लोखंडी तारांचा वापर टाळा. टीव्हीची डिश किंवा अँटेना वीजतारांपासून सुरक्षित अंतरावर ठेवा. पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. पत्रा वीजेचा उत्तम वाहक असल्याने जास्त धोका असल्याचेही महावितरणने कळविले आहे.
वीजपुरवठा खंडित होण्याची संभाव्य कारणे: पावसाळ्यात अनेकदा उन्हात तापलेले चिनी मातीचे इन्सुलेटर (चिमणी) पावसाने अचानक थंड होऊन तडकल्यास वीजप्रवाह खंडित होतो. खोदकामाने भूमिगत वाहिन्यांना धक्का लागल्यास किंवा पावसामुळे आर्द्रता निर्माण झाल्यास बिघाड होतो. झाडे कोसळणे, फांद्या तुटून पडणे, वीज कोसळणे यामुळेही वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. फिडर पिलर, रिंगमेन युनिटमध्ये पाणी शिरल्यास सुरक्षिततेसाठी वीजपुरवठा बंद करावा लागतो. वीज यंत्रणेजवळ टाकलेल्या कचऱ्यामुळे उंदीर, पक्षी यांसारखे प्राणी येतात आणि त्यांच्यामुळे शॉर्टसर्किट होऊन वीज जाते.
तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांक:
वीज पुरवठा खंडित झाल्यास किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास, महावितरण तुमच्या मदतीसाठी 24 तास उपलब्ध आहे, शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहक 1912 किंवा 19120 1800-212-3435 किंवा 1800-333-345 या टोल फ्री क्रमांकांवर 24 तास आपली तक्रार दाखल करू शकतात. वादळामुळे किंवा अतिवृष्टीमुळे तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची माहितीही या क्रमांकांवर देऊ शकता. याशिवाय, ज्या ग्राहकांनी आपले मोबाईल नंबर महावितरणकडे नोंदणीकृत केले आहेत, ते 022-50897100 या क्रमांकावर मिस कॉल देऊ शकतात. तसेच, “NOPOWER [12 अंकी ग्राहक क्रमांक]” असा संदेश टाइप करून 9930399303 या क्रमांकावर पाठविल्यास वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविली जाईल आणि ग्राहकाला त्याची माहिती देणारा संदेश प्राप्त होईल.
या पावसाळ्यात आपण सर्वजण जागरूक राहूया, खबरदारी घेऊया आणि विजेच्या धोक्यांपासून सुरक्षित राहूया! लक्षात ठेवा, नागरिकांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता असल्याचेही महावितरणने नमुद केले आहे.