आमदार सुभाष धोटेंचे वक्तव्य म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने ; देवराव भोंगळे यांचा पलटवार.

आमदार सुभाष धोटेंचे वक्तव्य म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने ; देवराव भोंगळे यांचा पलटवार.

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे विकासाचं राजकारण करणारे लोकनेते!

चंद्रपूर, दि. १५ : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विकासकामांचा झंझावात आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण, रोखठोक भुमिकेमुळे महाराष्ट्रभर त्यांना मानणारा वर्ग आहे. अशा लोकनेत्याला चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने भाजपचा विजय सोपा झाला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या उदासीनतेतून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे उलटसुलट वक्तव्य करीत ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहात आहेत, असा पलटवार राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख तथा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केला. भोंगळे यांनी आमदार सुभाष धोटेंना यातून प्रत्युत्तर दिले आहे.

आमदार धोटेंनी चंद्रपुरातील महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना या लोकसभा निवडणुकीत ना. सुधीर मुनगंटीवार यांचे डिपॉझिट जप्त होईल, असे वक्तव्य केले. त्यावर देवराव भोंगळेंनी धोटेंचा खरपूस समाचार घेतला.  २०१४ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याला मागास जिल्हा म्हणून ओळख होती. परंतु राजकारणाला समाजकारणाचा राजमार्ग मानणाऱ्या ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी अर्थ व वनमंत्री पदाची सुत्रे हातात घेतली आणि जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी चंग बांधला. आता चंद्रपूर जिल्ह्याचा चौफेर विकास झाला आहे. जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी गेल्या दहा वर्षात “न भुतो न भविष्यती” असा विकासनिधी खेचून आणला.

सुधीरभाऊंच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉटनिकल गार्डन, सैनिकी शाळा, बांबू संशोधन केंद्र, वन अकादमी, वैद्यकीय महाविद्यालय, कॅन्सर हॉस्पिटल, गावोगावी डिजिटल अंगणवाडी शाळा, सुसज्ज वाचनालये, महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी अगरबत्ती केंद्रे, युवकांसाठी रोजगार मेळावे, अद्ययावत क्रीडा संकुल, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने यशस्वी पाठपुरावा करण्याचे काम ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केले आहे. “सत्ता असो अथवा नसो” सुधीरभाऊ मुनगंटीवार विकासासाठी मागे हटत नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही त्यांनी कोरोना सारख्या महासाथीत जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सुधारण्यासह गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी पुढाकार घेतला, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे, असे भोंगळे म्हणाले.

शिंदे सरकारच्या काळात सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून छत्रपती शिवरायांच्या ३५० व्या राज्यभिषेकाचे वर्ष जगभर साजरे व्हावे या उदात्त हेतूने छत्रपतींच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारी वाघनखं त्यांनी लंडनहून परत आणण्यासाठी यशस्वी करार केला. जिल्ह्याचे वैभव असणारे काष्ठ अयोध्येतील प्रभू श्रीरामलल्लांच्या मंदिराकरीता तसेच नव्या संसद भवनाकरीता पाठविले, ते सुधीरभाऊंनीच. चंद्रपूरची ओळख असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे वैभव जगाला माहित व्हावे या उद्देशाने अलीकडेच ताडोबा महोत्सवाचे यशस्वी आयोजन ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केले, असे भोंगळे यांनी नमूद केले.

पिढ्यानपिढ्या घरात आमदारकी असुनही आपल्या राजुरा विधानसभा क्षेत्रात विकासाचे दिवे लाऊ न शकणाऱ्या सुभाष धोटेंना हे सर्व दिसेनासे झाले आहे, याचे नवल वाटते. त्यामुळे त्यांनी नुसतेच ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहाणे बंद करावे. खरंतर त्यांच्या कॉंग्रेसची देशात झालेली अवस्था बघून ते स्वतःच वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यातूनच ते असे वक्तव्य करीत आहेत, असा सणसणीत टोला देवराव भोंगळे यांनी लगावला आहे.