शेतकरी; कांदा, कापूस, सोयाबीन, धान, संत्रा उत्पादकांची फसवणूक

शासन आपल्या दारी च्या नावाखाली महायुतीकडून जनतेला गाजर

शेतकरी; कांदा, कापूस, सोयाबीन, धान, संत्रा उत्पादकांची फसवणूक

कापसाला १४ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळालाच पाहिजे

हातात गाजर, गळ्यात कापसाच्या माळा घालत विरोधकांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी

विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा जोरदार निषेध

मुंबई, २८ :- राज्यविधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळ परिसरात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. ‘शासन आपल्या दारी आले, मिळाले गाजर, ‘कांद्याचा करून वांदा, महायुतीने दिले गाजर’,’शेतकऱ्यांनी मागितली मदत, सरकारने दिले गाजर,’ ‘कापसाला पाहिजे होता हमीभाव, मिळाले गाजर, म्हणत सरकारच्या विरोधात विधिमंडळ परिसरात जोरदार निदर्शने केली.

राज्यातील जनतेला विकासाचे दिवा स्वप्न दाखवणाऱ्या ट्रिपल इंजिन सरकारने राज्यातील शेतकरी, मजूर, कामगार, विद्यार्थी, महिला , बेरोजगार यांना वेळोवेळी विकासाच्या नावाखाली गाजर दाखवले आहे. म्हणून, विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी हातात गाजर घेत सरकारचा निषेध केला. दरम्यान, कापसाची माळ घालून आक्रमक होत सरकारविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी याप्रसंगी शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, कापूस, सोयाबीन, धान, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांला फसवणाऱ्या सरकारचा,कांद्याची निर्यातबंदी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत विकासाच्या नावाखाली राज्यातील जनतेची घोर फसवणूक करणाऱ्या फसव्या सरकारचा निषेध केला.

काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते सतेज बंटी पाटील, काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड,डॉ. विश्वजित कदम, अमित देशमुख ,अभिजित वंजारी, जयश्री जाधव, नितीन राऊत, अनिल देशमुख , सुनील भुसारा, अशोक पवार, यांच्यासह विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्यात विकासाच्या नावाखाली घोर फसवणूक करणाऱ्या सरकारच्या विरोधात ‘शासन आपल्या दारी आले, मिळाले गाजर, ‘कांद्याचा करून वांदा, महायुतीने दिले गाजर’, ‘शेतकरयांनी मागितली मदत, सरकारने दिले गाजर,’ ‘कापसाला पाहिजे होता हमीभाव, मिळाले गाजर,घोषणा लिहिलेले फलक हातात घेत जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.