सत्ताधाऱ्यांकडून न्याय मिळत नसल्यामुळे पोलिस महिलेची विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे न्यायाची मागणी..

सत्ताधाऱ्यांकडून न्याय मिळत नसल्यामुळे पोलिस महिलेची विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे न्यायाची मागणी..

मुंबई,८
राज्यात महिलांवर बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आता खुद्द राज्यातील महिला पोलिसच असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील आठ महिला पोलिसांवर त्यांच्या तीन वरिष्ठांनीच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली असताना विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कार्यालयातही पोलिस महिलेवर अत्याचार झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या घटनेवर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकार आणि पोलीस प्रशासनाला सवाल करत धारेवर धरलं आहे.

श्री. विजय वडेट्टीवार ट्विट मध्ये म्हणतात की, पोलिस उपायुक्त, सशस्त्र पोलिस नायगाव, यांच्या कार्यालयात कार्यरत महिला पोलिस शिपाईवर होत असलेल्या अत्याचाराबाबत तक्रार माझ्या कार्यालयाला प्राप्त झाली आहे.
अश्लील शेरेबाजी होणे, कार्यालयात काम करत असतानाचा व्हिडिओ बनवणे, अश्लील हावभाव करून अत्याचार झाल्याची तक्रार सदर महिलेने केली आहे. झालेल्या संपूर्ण प्रकाराबाबत वरिष्ठांकडे सबंधित पोलिसाची तक्रार केल्यावर त्यावर कारवाई होण्याऐवजी सदर महिलेला मानसिक त्रास देण्यात आल्याची माहिती सुद्धा तक्रारीत करण्यात आली आहे.

वडेट्टीवार पुढे म्हणाले की,
राज्याच्या पोलिस दलात मोठ्या प्रमाणत महिला पोलिस आणि महिला कर्मचारी कार्यरत आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या खात्याकडे आहे तेथीलच महिला कर्मचारी जर सुरक्षित नसेल तर राज्यातील इतर महिलांच्या सुरक्षेची काय स्थिती असेल ह्याचा अंदाज न लावलेला बरा.पोलिस दलात कर्तव्यावर असताना होत असलेल्या अत्याचारामुळे महिला कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचत असून नैराश्याची भावना त्यांच्या मनात घर करत आहे.पोलिस दल, सत्ताधाऱ्यांकडून न्याय मिळत नसल्यामुळे जर महिलेला राज्याच्या विरोधीपक्षनेत्यांना पत्र लिहून न्याय हक्कासाठी लढा देण्याची मागणी होत असेल तर सध्याच्या सरकारमध्ये पोलिस विभाग आतून किती पोखरला गेला आहे हे यावरून स्पष्ट होते असे म्हणत वडेट्टीवार म्हणाले की, पोलिस दलात महिला पोलिसांवर लैंगिक अत्याचारांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर गृहखात्याने आता तरी सदर प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून महिलेला न्याय द्यावा आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी.