विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्याविरुद्ध पोलीसात तक्रार

विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्याविरुद्ध पोलीसात तक्रार

चंद्रपूर १४ डिसेंबर –  शहरात विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्या स्वराज्य वक्ता अकादमीविरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र. २ कार्यालयाद्वारे चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शहरातील गांधी चौक,मिलन चौक जयंत टॉकीज तसेच मनपा हद्दीतील शासकीय व खाजगी जागा, शहरातील पोस्ट / टेलीफोन पेटी, इलेक्ट्रिक खांब, रस्त्याच्या कडेची झाडे इत्यादींवर प्रशिक्षण देण्यासंबंधी माहिती असलेली भिंतीपत्रके मनपाकडुन पूर्वपरवानगी न घेता लावली असल्याचे सहायक आयुक्त सचिन माकोडे यांना १२ डिसेंबर रोजी पाहणीदरम्यान आढळुन आले.
संबंधितास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून पत्रके काढण्यास सांगितले असता अद्याप पावेतो भिंतीपत्रके न काढल्याने स्वराज्य वक्ता अकादमी, प्रशिक्षक समीर लेनगुळे यांच्यावर  महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत कलम ३ नुसार फौजदारी गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूर महापालिकेच्या वतीने शासकीय निधीद्वारे शहर सुशोभीकरणाची कामे करण्यात आली आहेत,गांधी चौक हे शहराचे मुख्य ठिकाण असुन तेथे दीपस्तंभ उभारलेला आहे. त्या जागेवरच संबंधितांनी भिंतीपत्रके लावली त्यामुळे शासकीय निधीचेही नुकसान झाले.
भिंतीपत्रके,पोस्टर्स,बॅनरबाजीमुळे शहराच्या विद्रुपीकरणासह शहराच्या सौंदर्यात बाधा येते किंबहुना वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असल्याने याबाबत उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने आखुन दिलेल्या सुचनांनुसार कारवाई करण्यात येते. त्यानुसार, परवानगीशिवाय पॅम्प्लेट्स, बॅनर्स, होर्डिंग्ज,कापडी फलक लावणा-यांवर आर्थिक दंडासह कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद या धोरणामध्ये करण्यात आली आहे.