शेतकरी आत्महत्येची 8 प्रकरणे मदतीकरीता निकाली

शेतकरी आत्महत्येची 8 प्रकरणे मदतीकरीता निकाली

Ø अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतला आढावा

चंद्रपूर, दि. 12 : जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीच्या बैठकीमध्ये  शेतकरी  आत्महत्येची एकूण 18 प्रकरणे समितीपुढे ठेवण्यात आली. अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत 8 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून 4 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली आहे, तर उर्वरित 6 प्रकरणे फेरचौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, नायब तहसिलदार गिता उत्तरवार, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक पी. एम. बिंकलवार, जिल्हा अग्रणी बँकेचे अतुल तायडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रतिनिधी शंकर लोडे, महसूल सहाय्यक प्रमोद गेडाम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

शेतीमध्ये सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येते.