बोगस मुल्यांकन करणाऱ्या प्राध्यापकावर कार्यवाही करा- अभाविप

अभाविप शिष्टमंडळाचे परिक्षा पुनर्मुल्याकंन, शुल्क परतावा धोरण आणि संशोधन आराखडा मान्यता

या मागण्यांविषयी गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगूरुंसमवेत चर्चा

मागण्या वेळेत पुर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा

बोगस मुल्यांकन करणाऱ्या प्राध्यापकावर कार्यवाही करा- अभाविप

चंद्रपूर/गडचिरोली :- गोंडवाना विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या परिक्षा निकालावर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता. परिक्षार्थ्यांनी पुर्ण पेपर लिहुन सुध्दा अपेक्षित गुण न मिळाल्याने परीक्षा निकाल निष्काळजीपणाने लावला गेला असा विद्यार्थ्यांचा गंभीर आरोप होता. पुनमुर्ल्यांकनाचे शुल्क जास्त असल्याने आणि दोनच विषय पुनर्मुल्यांकन करण्याच्या नियमांमुळे विद्यार्थ्यांना संकटांना सामोरे जावे लागत असल्याने या संदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपूर ने गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांना मेलद्वारे पत्र पाठवले, वेळोवेळी भेटी घेतल्या. त्यानंतर कुलगुरू बोकारे यांनी परिक्षा निकालावर आक्षेप असलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात यावे आणि आपल्या उत्तरपत्रिका बघाव्यात आणि समाधान झाले नसल्यास विद्यापीठ प्रशासन पुनर्मूल्यांकन करेल असे मेलद्वारे उत्तर दिले होते.

 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपूर ने निकालावर आक्षेप असलेल्या विद्यार्थ्यांना दि. 21 जुलै, 2023 रोजी गूगल फॉर्म द्वारे नाव व परिक्षेसंबंधी इतर माहिती देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचा नाव नोंदणीचा आकडा केवळ 5 तासात 2200 च्या जवळपास गेला. याबद्दल कुलगुरू महोदयांना अभाविप विदर्भ प्रदेश मंत्री शक्ती केराम, प्रणय म्हस्के, अभिलाश कुनघाडकर यांनी अवगत केले आणि विषयाचे गांभीर्य पटवून दिले. यावेळी अभाविपच्या मागणीनुसार कुलगुरु बोकारे यांनी यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयातच उत्तरपत्रिका बघायला दिल्या जातील असे सांगितले आणि आक्षेप असेल तर विनामूल्य पुनर्मूल्यांकन करण्याचेही मान्य केले यावेळी केराम यांनी बोगस मुल्यांकन करणाऱ्या प्राध्यापकावर कार्यवाही करण्यात यावी अशीही मागणी केली.

 

या मागणीसह विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) शैक्षणिक वर्ष 2023-24 साठीचे शुल्क परतावा धोरण जाहीर केले, त्यानुसार विद्यार्थ्याने 30 सप्टेंबरपर्यंत प्रवेश रद्द केल्यास संपूर्ण शुल्क आणि 31 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश रद्द केल्यास प्रक्रिया शुल्क म्हणून कमाल एक हजार रुपये वजा करून अन्य संपूर्ण शुल्काचा परतावा उच्च शिक्षण संस्थेने करणे बंधनकारक आहे असे असतांना उच्च शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना शुल्क आणि मूळ कागदपत्रे परत न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने देण्यात आला आहे. या संदर्भात गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने दिशादर्शक मार्गदर्शिका लवकरात लवकर जाहीर करुन विद्यार्थ्यांचे होणारे आर्थिक नुकसान थांबवावे तसेच संशोधक विद्यार्थ्यांच्या संशोधन आराखड्याला विद्यापीठाणे मान्यता द्यावी या मागण्या वेळेत पुर्ण न झाल्यास अभाविपच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला.