शेतक-यांनो! फक्त एक रुपयात पिकांना विमाकवच

शेतक-यांनो! फक्त एक रुपयात पिकांना विमाकवच

Ø प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नोंदणी करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

 

चंद्रपूर, दि. 19 : शेतक-यांच्या पिकांना केवळ 1 रुपयांत विमाकवच देण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने अर्थसंकल्पात घेतला. त्याची अंमलबजावणी खरीप हंगाम 2023 मध्ये करण्यात येत असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी शेतक-यांनी त्वरीत नोंदणी करून आपल्या पिकांचे विमाकवच प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील शेतक-यांना केले आहे.

 

नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतक-यांना नाविण्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, तसेच कृषी क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे जेणेकरून उत्पादनातील जोखमीपासून शेतक-यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे सर्व हेतु साध्य व्हावे, याकरीता केंद्र शासनाच्या वतीने 2016 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.

 

यापूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत एकूण विमा हप्ता रकमेच्या 2 ते 5 टक्के रक्कम शेतक-यांना भरावी लागत होती. त्यामुळे बहुतांश शेतकरी या योजनेत सहभागी होत नव्हते. परिणामी नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टीत नुकसान झाल्यानंतरही शेतक-यांना मदतीपासून वंचित राहावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केवळ 1 रुपया प्रति अर्ज या नाममात्र दराने प्रधानमंत्री पीक विमा योजना 2023-24 सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात खरीप 2023-24 या हंगामाकरीता तांदूळ, कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, मूग व उडीद या अधिसुचित पिकांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. सदर योजनेंतर्गत नोंदणीची अंतिम मुदत 31 जुलै 2023 आहे.

 

गतवर्षी जिल्ह्यातील केवळ 67634 शेतक-यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेऊन 51557 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले होते. यासाठी शेतक-यांनी एकूण 591 लक्ष रुपयांचा विमा हप्ता भरला होता व त्या अनुषंगाने 910.48 लक्ष रकमेचा विमा लाभ संबंधित शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात आला. यावर्षीच्या खरीप हंगामात केवळ 1 रुपयात नोंदणी करून शेतक-यांनी त्वरीत आपल्या पिकांचे संरक्षण करावे, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

 

चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगाम 2023 करीता सदर योजना ओरिएन्टल इन्शुरन्स कं. लि. या विमा कंपनी कडुन राबविण्यात येणार आहे. सदर विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक 1800118485 असून ई-मेल pmfby.160000@orientalinsurance.co.in आहे.

 

अडचण आल्यास यांच्याशी करा संपर्क : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी करतांना शेतक-यांना काही अडचण आल्यास त्यांनी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीच्या संबंधित तालुका समन्वयकांशी संपर्क करावा. सदर कंपनीचे जिल्हा समन्वयक प्रतीक करपेनवार (मो. 8080192076) असून देवानंद रोहनकर (तालुका समन्वयक, चंद्रपूर, मो. 9579808500), निलेश धोपटे (बल्लारपूर, मो. 9881545801), आशिष तुपट (ब्रम्हपुरी, मो. 9588608847), निहाल नागापुरे (सिंदेवाही, मो. 8459735371), रुपेश रोहणकर (मूल, मो. 7972564857), सुरज चौधरी (सावली, मो. 9579957562), तिलकराम चांदेकर (पोंभुर्णा, मो. 7378664440), संदीप बोगेवार (गोंडपिपरी, मो. 7448167282), अमन हजारे (भद्रावती, मो. 8237455338), अभिजीत गोगे (कोरपना, मो. 9022982158), तुषार चौधरी (वरोरा, मो. 8806066795), राकेश गट्टेवार (राजुरा, मो. 9423319383), चंद्रशेखर रेवतकर (चिमूर, मो. 9975026352), सुशांत निकोडे (नागभीड, मो. 8975704125) आणि कुणाल सिडाम (तालुका समन्वयक जिवती, मो. 7887374512) आहेत. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे कृषी विभागाने कळविले आहे.