प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 1 रुपया भरून शेतकऱ्यांनी सहभाग वाढवावा – जिल्हाधिकारी विनय गौडा

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 1 रुपया भरून शेतकऱ्यांनी सहभाग वाढवावा – जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø कृषी विभागाच्या प्रचार रथास हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

 

चंद्रपूर, दि. 13 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगामात 1 रुपया भरून शेतकऱ्यांनी सहभाग वाढवावा. यासाठी कृषी विभागाने या योजनेची व्यापक प्रसिद्धी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, कृषी उपसंचालक रविंद्र ठाकरे, कृषी विज्ञान केंद्राचे जिल्हा समन्वयक डॉ. विनोद नागदेवते, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक तृनाल फुलझेले, कृषी विकास अधिकारी यांचे प्रतिनिधी उमेशकुमार शिंदे, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक रमेश खोब्रागडे, सी.डी.सी.सी. बँकेचे प्रतिनिधी डी. एन. खिरटकर, शेतकरी प्रतिनिधी राजू बुद्धलवार, ईश्वर कामडी याच्यांस‍ह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, यापूर्वी विमा हप्ता रक्कम भरण्यासाठी भात पिकासाठी प्रती हेक्टरी शेतकरी हिस्सा म्हणून 955 रुपये भरावी लागत होती. तसेच शेतकऱ्यांच्या वतीने राज्य व केंद्र शासन प्रत्येकी 1120 असे एकूण 3195 रुपये विमा हप्ता विमा कंपनीकडे भरावा लागत होता. मात्र, आता शेतकऱ्यांचा विमा हप्ता रुपये 2074 राज्य शासनाने भरून शेतकऱ्यांना विमा रकमेचा भार कमी केला आहे. केवळ प्रती अर्ज 1 रुपयात 47,750 रुपयाचे प्रती हेक्टरी विमा संरक्षित होणार असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अधिसूचित पिकांचे विमा काढण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी यावेळी केले.

ते पुढे म्हणाले, कृषी सहायकाच्या मदतीने ग्रामपंचायत स्तरावर नियमित बैठका घ्याव्यात. कृषी सहायक व ग्रामपंचातीच्या मदतीने प्रत्येक गावात जाऊन दंवडी द्यावी. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा या दृष्टीने कार्य करावे. ओरीयंटल इन्शुरन्स कंपनीने जिल्हा व तालुका स्तरावर प्रतिनिधीची नियुक्ती करावी. त्यासोबतच, शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याकरीता आपल्या नजिकच्या बँक शाखेत तसेच आपले सरकार सेवा केंद्र / संग्राम केंद्र व संबंधित ग्रामपंचायतीच्या मदतीने विहीत मुदतीत विमा हप्ता भरुन सहभागी व्हावे, असेही ते म्हणाले.

प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक आहे. योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत खरीप हंगाम 2023 करीता दि. 31 जुलै 2023 अशी आहे. अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपटटीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. भाडेपटटीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडेकरार अपलोड करणे आवश्यक आहे. सन 2023-24 पासुन सर्वसमावेशक पिक विमा योजनेमध्ये सहभागी होणेसाठी शेतक-यांना प्रती अर्ज केवळ 1 रुपया भरुन पिक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. सर्व पिकांसाठी जोखीमस्तर 70 टक्के आहे.

योजना कार्यान्वयीन यंत्रणा :

चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगाम 2023 करीता सदर योजना ओरिएन्टल इन्शुरन्स कं. लि. या विमा कंपनी कडुन संबधित जिल्हयामध्ये राबविण्यात येणार आहे. सदर विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक 1800118485 असून ई-मेल pmfby.160000@orientalinsurance.co.in आहे.

विमा योजनेत सहभागी होण्याकरीता :

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकाकरीता पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांस या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र, त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक अगोदर (किमान 7 दिवस) संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणेबाबत लेखी कळविणे आवश्यक आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला 7/12 चा उतारा, बँक पासबुक, आधारकार्ड, पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देवून, हप्ता भरुन सहभाग घ्यावा. हप्ता भरलेली पोहोच पावती जपून ठेवावी. कॉमन सर्विस सेंटर (सीएससी) आपले सरकार सेवा केंद्र / संग्राम केंद्र संबंधित ग्रामपंचायतीच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता त्यासाठी www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता तसेच शेतकरी स्वत:च्या ॲड्रांईड मोबाईलवरुन एआयडीई (App for Intermediary Enrollment) या ॲपव्दारे सहभाग घेवू शकतात.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ :

जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत प्रधानमंत्री पिक विमा योजनेची माहिती मिळावी आणि या योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेची माहिती असणाऱ्या प्रचार रथाला जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पिकांचा विमा काढून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.