शेतकऱ्यांनी सोयाबीनची उगवणक्षमता घरच्या घरी तपासावी

शेतकऱ्यांनी सोयाबीनची उगवणक्षमता घरच्या घरी तपासावी

Ø सोयाबीनची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

 

चंद्रपूर, दि. 28: शेतकरी बांधवांचा असा समज आहे की, प्रत्येक वर्षी नवीन बियाणे खरेदी करूनच पेरणी करावी. परंतु सोयाबीन, मूग, उडीद, चवळी, हरभरा, भुईमूग, गहू या पिकांमध्ये स्वपरागसिंचन होत असल्याने कोणतेही संकरित वाण या पिकांमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे सरळवाणांचे बियाणे एकदा विकत घेतल्यानंतर त्यापासून तयार होणारे बियाणे आपण पुढे दोन वर्ष बियाणे म्हणून वापरू शकतो. त्यामुळे अनावश्यकपणे बाजारामधून दरवर्षी बियाणे खरेदी करण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर बाजारातून विकत आणलेले महागडे बियाणे उगवून न आल्यामुळे पेरणीकरीता वापरलेली खते, मनुष्यबळ आदी वाया जाते. शिवाय लेखी तक्रार, पंचनामा यामुळे पेरणीचा कालावधी निघून जाण्याचा धोका संभवतो. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होवु शकते. त्यामुळे खासगी कंपनीचे विकत घेतलेले बियाणे असले तरी बियाणे उगवणक्षमता तपासूनच पेरणी करणे फायद्याचे ठरते.

 

ज्या शेतकऱ्यांकडे मागील हंगामातील सोयाबीन शिल्लक असेल त्या प्रत्येक शेतक-याने घरच्या सोयाबीनची साध्या सोप्या पद्धतीने उगवण तपासणी केली तर प्रत्येकाच्या खर्चात बरीच बचत होईल. आणि फसवणूकसुद्धा टाळता येईल.

 

अशी करा सोयाबीन बियाण्यांची घरगुती उगवणक्षमता तपासणी:

 

सर्व शेतकऱ्यांनी घरगुती उगवण तपासणी करून या हंगामात घरचेच सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरावे, उगवण क्षमता तपासणी करण्याच्या सोप्या पद्धती:

 

अ) गोणपाट वापरून: बियाण्याच्या प्रत्येक पोत्यातून खोलवर हात घालून मूठभर धान्य बाहेर काढावे. सर्व पोत्यातून काढलेले धान्य एकत्र करून घ्यावे. गोणपाटाचे 6 चौकोनी तुकडे घेऊन स्वच्छ धुऊन घ्या. एक तुकडा जमिनीवर पसरवा. पोत्यातून काढलेल्या धान्यातून सरसकट 100 दाणे मोजून दीड ते दोन सेंटीमीटर अंतरावर (बोटाचं एक कांड अंतरावर) 10-10 च्या रांगेत गोणपाटाच्या एका तुकड्यावर ओळीत ठेवावे, अशा प्रकारे 100 दाण्यांचे तीन नमुने तयार करावे. गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करावे व बियाण्यांवर दुसऱ्या गोणपाटाच्या तुकडा अंथरूण पुन्हा चांगले पाणी मारावे. गोणपाटाच्या तुकड्याची बियाण्यांसकट गुंडाळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवा. त्यावर अधून मधून पाणी शिंपडून ओले ठेवावे. सहा-सात दिवसानंतर ही गुंडाळी जमिनीवर पसरून उघडा. चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करा व मोजा. तीनही गुंडाळ्याची सरासरी काढून 100 पैकी 70 किंवा त्यापेक्षा जास्त दाणे जर कोंब आलेले असतील तर बियाणे बाजारातील बियाणे सारखेच गुणवत्तेचे आहे असे समजा आणि शिफारशीप्रमाणे मात्रेत पेरणीसाठी वापरा. जर उगवण झालेल्या बियाण्याची सरासरी संख्या 70 पेक्षा कमी असेल तर एकरी बियाण्यांचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करावे. पेरणी करताना बियाण्यास बुरशीनाशकांची व जिवाणू संवर्धकांची प्रक्रिया करण्यास विसरू नका.

 

ब) वर्तमान पत्राचा कागद वापरून:

 

वर्तमान पत्राचा एक कागद घेऊन त्याच्या चार घड्या पाडाव्यात. यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो पूर्ण कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येकी दहा बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी. अशा रीतीने शंभर बियांच्या दहा गुंडाळ्या तयार कराव्यात. त्या गुंडाळ्या पॉलिथिन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसानंतर त्यामधील अंकुर मोजावे.

 

क) पाण्यात भिजवून- कमी वेळात:

 

बियाण्याच्या प्रत्येक पोत्यातून खोलवर हात घालून मूठभर धान्य बाहेर काढा. सर्व पोत्यातून काढलेले धान्य एकत्र करून घ्या. त्या नमुन्यात 100 दाणे मोजून वेगळे काढा. असे 100 दाण्यांचे 3 संच तयार करावा. शक्यतो काचेच्या ३ ग्लासात पाणी घेऊन त्यात हे दाणे टाकावे. 5 ते 6 मिनिटे तसेच राहू द्यावे. त्यानंतर पाणी फेकून देऊन दाणे वेगळे काढा व त्यामधील पूर्णतः फुगलेले तसेच बियाण्याच्या टरफलावर सुरकुत्या पडलेले दाणे वेगळे करावे. दोन्ही प्रकारच्या दाण्यांची संख्या मोजून घ्या. जो दाणा 5 ते 6 मिनिटे पाण्यात ठेवल्यानंतर चांगला टम्म फुगतो तो पेरणीसाठी अयोग्य असतो. कारण अशा बियाण्याच्या टरफलाला इजा झालेली असल्याने किंवा बिजांकुर कूजल्यामुळे त्यामध्ये पाणी लवकर आत शिरते व तो लवकर फुगतो.

 

मात्र, जे बियाणे चांगले असते त्याचे टरफल शाबूत असल्यामुळे त्याच्यात पाणी आत शिरत नाही. फक्त टरफलातून पाणी आत गेल्यामुळे त्यावर सुरकुत्या पडल्या सारखे दिसते. 100 दाण्यात पैकी जर सरासरी 70 किंवा जास्त दाणे अशाप्रकारे न फुगलेले, सुरकुत्या न पडलेले असेल तर बियाणे बाजारातील बियाण्यासारखेच गुणवत्तेचे आहे, असे समजा आणि शिफारशीप्रमाणे मात्रेत पेरणीसाठी वापरावे. शेतक-यांनी स्वत:कडील बियाणे वापरण्यापुर्वी त्याची उगवणक्षमता उपरोक्त पध्दतीने तपासून नंतरच अशा बियाण्याची पेरणी करावी. उगवणक्षमता 70 टक्केपेक्षा कमी असल्यास त्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे.सोयाबीन बियाणेबाबत उगवणक्षमतेच्या प्रमाणात पेरणीसाठी किती बियाणे लागेल हे काढण्यासाठी तक्त्याचा वापर करावा.

 

ऊगवणक्षमतेच्या प्रमाणात पेरणीसाठी किती बियाणे लागेल हे काढण्यासाठी 70 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 30 किलो प्रती एकर बियाणे आवश्यक आहे. 69 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 30.5 किलो प्रती एकर, 68 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 31 किलो प्रती एकर, 67 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 31.5 किलो प्रती एकर, 66 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 32 किलो प्रती एकर, 65 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 32.5 किलो प्रती एकर, 64 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 33 किलो प्रती एकर, 63 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 33.5 किलो प्रती एकर, 62 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 34 किलो प्रती एकर, 61 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 34.5 किलो प्रती एकर, 60 टक्के उगवणक्षमता असल्यास पेरणीसाठी 35 किलो प्रती एकर, उगवणक्षमतेनुसार बियाणांची आवश्यकता लागेल. शेतकऱ्यांनी कृषी विभागाने दिलेल्या सुचनाचा अवलंब करावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.