25 एप्रिलपासून जिल्ह्यात हिवताप प्रतिरोध मोहिमेस सुरुवात

25 एप्रिलपासून जिल्ह्यात हिवताप प्रतिरोध मोहिमेस सुरुवात

 

चंद्रपूर, दि. 24: राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर हिवतापाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अंमलबजावणीमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग करून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संपूर्ण एप्रिल महिना हा हिवताप जनजागृती महिना म्हणून राबविण्यात येत आहे.

 

हिवताप हा प्लासमोडियम नावाच्या परोपजीवी जंतूमुळे होणारा आजार आहे. हा आजार बाधित अॅनाफिलीस मादी डासाच्या चावल्यामुळे पसरतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ साचलेले पाणी, पाण्याचे हौद, पावसाळी पाण्याचे डबके, भात शेतातील पाणी, कॅनलमधील पाणी व नदीपात्रातील खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये होते.

 

आजाराची लक्षणे : हिवताप झालेल्या रुग्णाला थंडी वाजून ताप येतो. डोकेदुखी, मळमळ, उलटी व अंगदुखी आदी लक्षणे दिसून येतात. भारतात हिवतापाचे मुख्यतः दोन प्रकार आढळून येतात. प्लासमोडियम फॅलसीपॅरम व प्लासमोडियम व्हायव्हॅक्स. लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णाने आपला रक्तनमुना आरोग्य कर्मचाऱ्यांकडून किंवा आरोग्य संस्थेत जाऊन तपासून घ्यावा. तपासणीअंती रक्त नमुना हिवतापाकरिता दूषित आढळून आल्यास आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत सदर रुग्णास मोफत औषधोपचार करण्यात येतो. हा उपचार रुग्णाने पूर्ण घेणे गरजेचे असते. वेळेवर निदान न झाल्यास किंवा उपचार पूर्ण न केल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

नागरिकांनी घ्यावयाची काळजी : गावाच्या किंवा घराच्या सभावताली असलेली डबकी, खड्डे बुजवावेत. गटर, नाल्या वाहत्या कराव्यात. इमारतीच्या टाक्या, हौद यांना घट्ट झाकण बसवावेत. किंवा घट्ट कापड बांधावेत. फ्रिज, कुलर, कुंड्या डब्बे व अन्य वस्तूमध्ये सात दिवसापेक्षा जास्त काळ पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. गप्पी माशांचा वापर करावा. घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. डास विरोध मलम किंवा अगरबत्तीचा वापर करावा. पूर्ण बाह्याचे कपडे घालावेत. जेणेकरून, आपली डास चावण्यापासून सुरक्षा होईल व हिवताप होण्यापासून आपले रक्षण होईल.

 

या जनजागृती मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत दररोज विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत ताप रुग्ण सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच डासाची उत्पत्ती थांबविण्याबाबत उपाययोजना करण्यात येत आहे. गावामध्ये रॅली, सभा व शाळेच्या मुलांना याबाबत माहिती अवगत करण्यासाठी सभा आयोजित केल्या जात आहेत. तसेच डास अळ्या व गप्पी मासे शाळेत आणि गावात प्रदर्शनीद्वारे दाखवण्यात येत आहे.

 

जिल्ह्यात सन 2022 मध्ये 121 हिवतापाचे दूषित रुग्ण आढळून आले होते. त्यातील अधिकांश रुग्ण हे जिवती, राजुरा, ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यातील आहेत. एकूण दूषित रुग्णांपैकी 4 रुग्णाचा मृत्यू हा हिवतापामुळे झाला आहे. तरी सदर आजाराला रोखण्याकरिता उपाययोजनांचा काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर यांनी केले आहे.