नवीन तंत्रज्ञान दालन,कृषी यशोगाथांचा होणार जागर शेतकरी बंधुनो,कृषी महोत्सवाला भेट द्या- कृषी विभागाचे आवाहन

नवीन तंत्रज्ञान दालन,कृषी यशोगाथांचा होणार जागर शेतकरी बंधुनो,कृषी महोत्सवाला भेट द्या- कृषी विभागाचे आवाहन

· जिल्हा कृषी महोत्सवाचा प्रारंभ आजपासुन

 

भंडारा दि 16: शेतीमधील नवीन प्रयोग,शेतकरी यशोगाथा, नवीन तंत्रज्ञान यांचा तिहेरी संगम असलेल्या जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन उद्या दि.16 मार्चपासून दसरा मैदानावर होत आहे.

 

तरी शेतकऱ्यांनी या महोत्सवाला भेट द्यावी असावं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अर्चना कडू यांनी केले आहे.

 

कृषी विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) भंडारा यांच्या, विद्यमाने 17 ते 21 मार्च दरम्यान दसरा मैदान, शास्त्री चौक, भंडारा येथे जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

कृषि महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक 17 मार्च शुक्रवारला उपमुख्यमंत्री तथा मंत्री, गृह व वित्त विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास गृहनिर्माण, उर्जा, राजशिष्टाचार तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते होणार आहे. जिल्हा परीषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे हे अध्यक्षस्थानी असतील.

 

कृषी प्रदर्शन, उत्पादक ते थेट ग्राहक विक्री, चर्चासत्र व परिसंवाद, शेतकरी सन्मान समारंभ, महिला बचतगट निर्मिती वस्तुंचे प्रदर्शन व विक्री आणि सांस्कृतिक कार्यक्रम ही महोत्सवाची वैशिष्टय आहेत. या महोत्सवात सेंद्रिय पद्धतीने उत्पादीत केलेले सुगंधित तांदुळ भंडारा जिल्हयाचे परंपरागत वाणाचे, कडधान्य, डाळी, गुळ व हळद आदी अन्नधान्य विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. त्याचप्रमाणे कलात्मक वस्तु, खाद्य पदार्थ आणि बचत गटांनी तयार केलेल्या गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल राहणार आहेत.

 

या महोत्सवात दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, भाजीपाला, धानावरील प्रक्रिया उद्योग, रेशीम उद्योग, पशुखाद्य, शेती अवजार, नाबार्ड व बँकेचे स्टॉल प्रामुख्याने असणार आहेत. शेतकऱ्यांना नविन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी विविध विषयावरील परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवात शेतीमध्ये विविध प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांवर आधारीत यशोगाथा दाखविण्यात येतील. जिल्हयात उत्कृष्ट शेती पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा या महोत्सवात सत्कार केला जाणार आहे. याशिवाय शासनाच्या विविध विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल या प्रदर्शनात लावण्यात येतील. शेतकरी बंधुसाठी माहितीपूर्ण असणाऱ्या कृषी महोत्सवात जास्तीत जास्त शेतकरी, ग्राहकांनी तसेच नागारीकांनी भेट देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.