निमंत्रित क्रिकेट स्पर्धेतून उत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटपटू निवडा-हेमंत पाटील

निमंत्रित क्रिकेट स्पर्धेतून उत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटपटू निवडा-हेमंत पाटील

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष, सचिवांना पत्र

मुंबई, ९ मार्च २०२३

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) माध्यमातून यावर्षी होणाऱ्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेतून राज्यातील उत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटपटूंची निवड करण्यासाठी संघटनेच्या अध्यक्ष,सचिवांनी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी गुरूवारी केली.स्पर्धेच्या माध्यमातून ‘रणजी कॅम्प’ साठी होतकरू व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व फलंदाजी,गोलंदाजी मध्ये पहिल्या २० क्रमांकाच्या खेळाडूंची निवड करून निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धेचा मार्ग सुखर करावा, अशी विनंती देखील पाटील यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना पत्रातून केली आहे.

निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धा घेवून त्यातून चांगल्या खेळाडूंची निवड होत नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.खेळाडूंचे त्यामुळे मानसिक खच्चीकरण होत आहे. वर्षभर सराव करून, मेहनत करून तसेच उत्कृष्ट कामगिरी करून देखील रणजी क्रिकेट स्पर्धेच्या कॅम्पमध्ये सुद्धा स्थान मिळत नसल्याने खेळाडूंवरील अपेक्षांचे ओझ आणखी वाढत आहे.याअनुषंगाने एमसीएने विचार करण्याची गरज असल्याचे पाटील यांनी अधोरेखित केले.दरवर्षी चांगली कामगिरी करून देखील अनेक खेळाडूंना रणजी कॅम्पसाठी बोलावले जात नाही. यापुढे उत्कृष्ट फलंदाज,गोलदांज, यष्टीरक्षकांची निवड पारदर्शकरित्या करण्याचे कर्तव्य असोसिएशच्या निवड समितीने पार पाडण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.

राज्यात निमंत्रित क्रिकेट स्पर्धा चालू होत आहे.प्रत्येक जिल्ह्यातून एक टीम तसेच पुण्यातील अनेक क्लब या क्रिकेट स्पर्धा खेळत आहेत. यावर एमसीएने मोठा खर्च नियोजित केला आहे.या अनुषंगाने राज्यातील दर्जेदार खेळाडूंना समोर आणून त्यांच्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खिलाडीवृत्ती, क्रिकेट रुजवण्याच्या दिशेने प्रयत्न करावा,असे आवाहन पाटील यांनी केले.