जिल्ह्यातील तरुण उद्योजकांनी स्टार्टअप व नाविन्यता यात्रेत सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

जिल्ह्यातील तरुण उद्योजकांनी स्टार्टअप व नाविन्यता यात्रेत सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

चंद्रपूर, दि. 18 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण कल्पक उद्योजकांनी, स्टार्टअप व नाविन्यता यात्रेमध्ये नोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राज्यात 15 ऑगस्टपासून महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून नवसंकल्पना घेऊन येणाऱ्या युवक-युवतींना प्रशिक्षण तसेच त्यांच्या संकल्पनाचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. उत्तम संकल्पना सादर करणाऱ्या युवकांना 10 हजार रुपयापासून तर 1 लाख रुपयापर्यंतची पारितोषिके दिली जाणार आहे.

मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक आणि पुणे या सहा विभागात स्टार्टअप यात्रेचा स्वातंत्र्यदिनी प्रारंभ झाला. तळागळातील व ग्रामीण दुर्गम भागातील नवउद्योगाचा आणि नाविन्यपूर्ण संकल्पनेचा शोध घेणे व नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ञ मार्गदर्शन, तसेच राज्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे, असा या स्टार्टअप यात्रेचा उद्देश आहे. स्टार्टअप यात्रेतील मोबाईल वाहन तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, आय.टी.आय., लोकसमूह एकत्रित होणाऱ्या जागा आदी ठिकाणी जाऊन उद्योजकता आणि स्टार्टअप विषयी जनजागृती करेल. नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या नागरीकांची नोंदणी करून त्यांना माहिती देण्यात येईल. तसेच यात्रेमध्ये जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर आणि सादरीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता ही प्रशासन आणि इतर विषयातील नवनवीन संकल्पना स्टार्टअपना पारितोषिक दिले जाणार आहे. जिल्ह्यातील सादरीकरण सत्रातील उत्तम संकल्पनेचे राज्यस्तरीय तज्ञ समिती समोर अंतिम सादरीकरण होईल. व जिल्ह्यामध्ये उत्तम 3 विजेत्याची निवड केली जाईल. प्रथम बक्षीस 25 हजार, द्वितीय 15 हजार तर तृतीय 10 हजार अशी पारितोषके देण्यात येईल. विभाग स्तरावर 6 सर्वोत्कृष्ट नवउद्योजक व 6 सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिकांना प्रत्येकी 1 लाख रुपयाचे पारितोषिक दिल्या जाईल. तर राज्यस्तरावर 14 विजेत्यांना पारितोषिके दिली जातील. यामध्ये प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये तर द्वितीय पारितोषिक 75 हजार रुपये असे आहेत. याशिवाय विजेत्या संकल्पनांना आवश्यक पाठबळ देण्यात येणार आहे.

स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे जिल्ह्यातील मार्गक्रमण :

स्टार्टअप व नाविन्यता यात्रा मार्गक्रमण दि. 26 ऑगस्ट 2022 रोजी नागभीड व चिमूर तालुका, 27 ऑगस्ट रोजी ब्रह्मपुरी व सिंदेवाही, 29 ऑगस्ट रोजी मुल व सावली, 30 ऑगस्ट रोजी पोभुंर्णा व जिवती, 1 सप्टेंबर रोजी कोरपणा व चंद्रपूर, 2 सप्टेंबर रोजी भद्रावती, वरोरा, व गोंडपिपरी तर 3 सप्टेंबर रोजी बल्लारपूर व राजुरा या तालुक्याच्या ठिकाणी स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे मार्गक्रमण असणार आहे.

चंद्रपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (खाजगी व शासकीय) तंत्रनिकेतन महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय व कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी http://bit.ly/EntrepreneurSpeaker या लिंकचा उपयोग करून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.