फाळणीमधील स्थलांतरीतांनी भोगलेल्या यातना आपण विसरू शकत नाही – जिल्हाधिकारी, मीणा

फाळणीमधील स्थलांतरीतांनी भोगलेल्या यातना आपण विसरू शकत नाही – जिल्हाधिकारी, मीणा

 “फाळणी दु:खद स्मृती दिना”निमित्त दु:खद आठवणींना उजाळा

गडचिरोली, दि.14* : अतिशय वाईट परिस्थिती मधून भारत देशाची फाळणी 1947 ला झाली. हजारो लोकांना बेघर व्हावे लागले, आपले जन्मस्थळ सोडून इतरत्र आसरा घ्यावा लागला. एकीकडे स्वातंत्र्याची पहाट उगवत असताना फाळणी दरम्यान जे लोक आपले घर सोडून इतर ठिकाणी जात होते त्यांनी भोगलेल्या यातना आपण विसरू शकत नाही. अशा या आपल्याच बांधवांना स्मरून आपण हा फाळणी दुःखद स्मृतिदिन साजरा करीत आहोत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी नियोजन भवन कार्यालय गडचिरोली येथे “फाळणी दु:खद स्मृती दिन“ कार्यक्रमावेळी केले. देशात 14 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या फाळणी दरम्यान हजारो लोकांना ज्या यातना झाल्या, मनस्ताप आणि दु:ख भोगावे लागले त्याची कल्पना आताच्या लोकांना यावी यादृष्टीने हा दिवस संपुर्ण देशात आयोजित करण्यात आला. यावेळी गडचिरोली जिल्हयातील वडसा येथे फाळणीनंतर आलेल्या जेष्ठ नागरिकांना अनुभव कथनासाठी बोलविण्यात आले होते. यात प्रत्यक्षदर्शी आसाराम कुकरेजा हे 87 वर्षीय नागरिक उपस्थित होते. त्यांचेबरोबर काही स्थलांतरीतांचे नातेवाईकही आले होते. व्यासपीठावर यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जेष्ठ नागरिक डॉ.कुंभारे, अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र भुयार, महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष जेसा मोटवाणी व विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थिती होते.

अनुभव कथनावेळी आसाराम कुकरेजा यांचे आश्रु आनावर

कराचीवरून आम्ही बोटीने अहमदाबादला उतरलो, दोन महिने तंबूत काढले. पुढे कॅम्पमधे 2 वर्ष मजूरी करीत वास्तव्य होते. शे दोनशे एकर जमीन, घर सोडून आम्हाला आमचे जन्मस्थळ सोडावे लागले. 1950 ला वडसा येथे आम्हाला हक्काची जागा मिळाली. हे सांगत असताना कुकरेजा यांचे अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी आपणाला गडचिरोली येथील मिळालेल्या मदतीबाबत धन्यवाद व्यक्त केले. गोंडी आदिवासींनी केलेली मदत आवर्जून सांगितली. ते म्हणाले त्यावेळी भारत देशाने केलेली मदत आम्ही विसरू शकत नाही.

प्रदर्शनाचे कुकरेजा यांचे हस्तेच उद्घाटन

देशात 14 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या फाळणी दरम्यान हजारो लोकांना ज्या यातना झाल्या, मनस्ताप आणि दु:ख भोगावे लागले, याची कल्पना यावी यादृष्टीने विविध घटनांची आठवण करून देणाऱ्या चित्ररूपी प्रदर्शनाचेही आयोजन आज करण्यात आले होते. याचे उद्घाटन जिल्हाधिकारी मीणा यांनी श्री कुकरेजा यांना करण्याची विनंती केली. या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिकांनी पाहणी करून घडलेल्या घटनांबद्दल माहिती जाणून घेतली.

जिल्हाधिकारी, सीईओ इतर अधिकारी कर्मचारी यांनी रॅलीतून दिला संदेश

जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते कॉम्लेर्क्स परिसरात रॅली काढून “फाळणी दु:खद स्मृती दिन“ बाबत फाळणी दरम्यानच्या घटनांचा संदेश रॅलीमधून देण्यात आला. यावेळी भारतीय स्वातंत्र दिनाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी कुमार आशीर्वाद, जेष्ठ नागरिक डॉ.कुंभारे, अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र भुयार, महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष जेसा मोटवाणी व विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थिती होते.