भ्रष्टाचाराने पोखरलेल्या देशाची पुर्नबांधणी सुरू-हेमंत पाटील

भ्रष्टाचाराने पोखरलेल्या देशाची पुर्नबांधणी सुरू-हेमंत पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांमुळे निधी थेट गोरगरीबांच्या खात्यात

पुणे, ३१ ऑगस्ट २०२२

देशात सुरूवातीपासून केंद्रात काँग्रेस पक्ष सत्तेवर राहीला आहे. देशाच्या पाचव्या पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्यासह इतरही पंतप्रधानांच्या कार्यकाळात देशात भ्रष्टाचार बोकाळला होता. अनेक प्रकरणे उघडकीस आली होती.स्वातंत्र्यानंतर देशाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. पंरतु, आता भ्रष्टाचाराने पोखरलेल्या देशाची पुर्नबांधणी सुरू आहे, असे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी रविवारी व्यक्त केले. पुण्यातील पत्रकार भवन येथे ओबीसी समाज आरक्षण कृती समिती तर्फे आयोजित पदाधिकार्यांच्या बैठकीला पाटील यांनी संबोधित केले.

सुरूवातीपासूनच आपल्या विरोधात बोलणाऱ्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून तुरूंगात टाकण्याचे काम इंदिरा गांधींनी केले. विरोधकांची विविध भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली.पुढे कॉंग्रेसने देखील हीच परंपरा कायम ठेवली. इंदिरा तसेच सोनिया गांधी यांच्याकडे कॉंग्रेसचे नेतृत्व असतांना अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणांनी देशाला हादरून सोडले होते.अशात भ्रष्टाचाराने कंटाळलेल्या सर्वसामान्यांच्या भावनांचा उद्रेक झाला.

अण्णा हजारे यांनी या उद्रेकाला आंदोलनात रुपांतरीत केल्याने केंद्रातील तत्कालीन कॉंग्रेस सरकारची प्रतिमा मलीन झाली. यातच २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पक्षाचा दारून पराभव झाला, असे पाटील म्हणाले.केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक मंत्रालयांना बळ देण्याचे काम त्यांनी केले. भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी ते अजूनही प्रयत्नरत आहेत.८ वर्षांच्या कार्यकाळात विरोधकांना सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर म्हणावे तेवढे घेरता आले नाही.

पंतप्रधानांच्या धोरणात्मक बदलांमुळे दिल्लीतून दिला जाणारा निधी आता थेट तळागाळातील सर्वसामान्यांच्या बॅंक खात्यांपर्यंत पोहचतो आहे. त्यात ग्रामीण भागाला भक्कम करण्याचा प्रयत्न केंद्राकडून केला जात आहे.ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्याच्या अनेक उपाययोजना सरकारकडून राबवल्या जात आहेत.पंतप्रधानांची दुरदृष्टी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रशासनावर असलेली पकड तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटन कौशल्याच्या बळावर भाजप देशाच्या कानाकोपर्यापर्यंत पोहचत आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

उद्धव ठाकरे यांनी त्यांची चुक मान्य करावी!

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. विद्यमान सरकार हे अडीच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करेल, असे चित्र सध्यातरी दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार ३ ऑगस्टच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर होईल. पंरतु, हे सर्व होत असतांना उद्धव ठाकरे यांनी त्यांची चुक सुधारून भाजपला साथ देण्याचे आवाहन देखील पाटील यांनी केले आहे. ठाकरे यांच्या वर्तनामुळे तसेच त्यांच्या आजुबाजूला असलेल्या ठरावीक नेत्यांच्या चौकटीमुळे ४० हून अधिक आमदार त्यांना सोडून गेले आहेत.आता ठाकरे यांनी चुक मान्य करीत पुन्हा शिवसेना मजबूत करण्यावर भर देण्यासाठी जोमाने कामाला लागले पाहिजे, असा सल्ला देखील पाटील यांनी यानिमित्ताने दिला.