विधी सेवा प्राधिकरण तर्फे पर्यावरण प्रदूषण व मानवी हक्कांचे ऱ्हास या विषयावर कार्यशाळा

विधी सेवा प्राधिकरण तर्फे पर्यावरण प्रदूषण व मानवी हक्कांचे ऱ्हास या विषयावर कार्यशाळा

चंद्रपूर, दि. 26 जुलै : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा कविता बी.अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण प्रदूषण व मानवी हक्कांचे ऱ्हास या विषयावर कार्यशाळा जिल्हा वकील संघाच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती.

या कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.जी भोसले, सह दिवाणी न्यायाधीश महेश काळे, वकील संघाचे अध्यक्ष अभय पाचपोर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अतुल सातफळे, प्रामुख्याने उपस्थित होते.

नवी दिल्ली येथे प्रचंड प्रमाणावर प्रदूषण असतानाही नागरिकांनी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले असून आपण सुद्धा प्रदूषण मुक्तीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.जी भोसले यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अतुल सातफळे यांनी त्यांच्या कार्यालयामार्फत प्रदूषणाबाबत केली जाणारी कार्यवाही तसेच प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी असलेल्या उपाययोजना स्पष्ट करून प्रदूषण विरहित आयुष्य जगणे फायद्याचे असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष अभय पाचपोर यांनी, कार्यक्रमाचे संचालन अधिवक्ता आशिष धर्मपुरीवार तर आभार अॅड.कार्लेकर यांनी मानले.