आत्यावश्यक सेवा वगळता बाकी आस्थापना शनिवार पर्यंत बंद राहणार – जिल्हाधिकारी 

आत्यावश्यक सेवा वगळता बाकी आस्थापना शनिवार पर्यंत बंद राहणार – जिल्हाधिकारी 

जिल्हयातील पाऊस व नद्यांचा वाढत्या विसर्गामुळे घेतला निर्णय

गडचिरोली, दि.13: जिल्हयात 10 जुलै पासून मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे प्रमुख नद्यांसह छोट्या नाल्यांमधून पाणी वाहत आहे. यामुळे अहेरी, सिरोंचा व भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच गडचिरोली, आरमोरी या भागातही पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे. जिल्हा प्रशासनाने दि.11 ते 13 जुलै दरम्यान आत्यावश्यक सेवा वगळता बाकी आस्थापना बंद राहणार याबाबत आदेश निर्गमित केले होते. आता सदर आदेशाला जिल्हाधिकारी संजय मीना यांनी शनिवार, दि.16 जुलै 2022 च्या मध्यरात्री पर्यंत वाढ केली आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. गडचिरोली जिल्हयात कोणत्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी तीन दिवस घरातच कुटुंबाबरोबर वेळ घालवावा. कारण फिरण्यासाठी अथवा अति महत्त्वाचे काम नसताना बाहेर पडल्यास आपल्यासह कुटुंबाला धोखा निर्माण होवू शकतो. जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणेसह सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहे. त्यामूळे नैसर्गिक आपत्तीला टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. यामूळे प्रशासनाने निर्णय घेतला आहे की, शनिवार, दि. 16 जुलै 2022 चे 24.00 वाजेपर्यंत शासकीय, निमशासकीय व आत्यावश्यक सेवा वगळता शाळा, कॉलेजेस, बाकी आस्थापना बंद राहणार आहेत. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली संजय मीना यांनी कळविले आहे.