प्रदूषणावर नियंत्रण मिळविणे आवश्यक – आयुक्त राजेश मोहिते

प्रदूषणावर नियंत्रण मिळविणे आवश्यक – आयुक्त राजेश मोहिते
राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत आढावा बैठक

चंद्रपूर ३० मे –  प्रदूषण मुक्तीसाठी शासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे. चंद्रपूर शहरातील हवा प्रदूषणाची पातळी निर्धारित मानकापेक्षा अधिक व धोकादायक असल्याने प्रदूषणावर नियंत्रण मिळविणे आवश्यक असल्याचे आयुक्त राजेश मोहीते यांनी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत सांगितले.
आपल्या शहरात वाहनांचे आणि कारखान्यांचे प्रदूषण तर मोठ्या प्रमाणात आहेच मात्र रबरी टायर, पाला पाचोळा व इतर कचरा जाळल्याने मोठ्या प्रमाणात धुर होऊन कार्बन हवेत पसरतो. सकाळ संध्याकाळी कोळसा जाळल्यास त्याचा धुर हा आपल्या श्वास घेण्याच्या पातळीवर असतो आणि तेव्हा तो धोकादायक असतो.
नव्या पिढीला शुद्ध हवा, शुद्ध पाणी, स्वच्छ रस्ते देणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या शहरात, समाजात, कुटुंबात याविषयी जागृती झाली पाहिजे. सांडपाणी, कचरा यांची योग्यरित्या विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. मनपा स्वच्छता निरीक्षकांनी कचरा जाळल्या जाऊ नये याकडे विशेष लक्ष द्यावे तसेच रोड झडाई मशीन लवकरात लवकर कार्यान्वीत होईल या दृष्टिंग स्वच्छता विभागाने लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
याप्रसंगी इको प्रोचे बंडू धोत्रे यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच वायू गुणवत्ता व्यवस्थापन योजना, आरोग्य क्षेत्र नियोजन, परिवहन क्षेत्र नियोजन, औद्योगिक क्षेत्र नियोजन, ध्वनी प्रदूषण क्षेत्र नियोजन,  शहरातील प्रदूषण नियंत्रण, भविष्यातील कृती आराखडा या विषयांच्या अनुषंगाने उपस्थीत अधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले.
सदर बैठकीस पीडब्लुडीतर्फे अमर शेट्टीवार, सीटीपीएसतर्फे केएम राऊत, फेरो अलॉयतर्फे आर आर जनबंधु, जिल्हा परीषद आरोग्य विभागातर्फे डॉ. मडावी, आरटीओतर्फे किरण मोरे, ट्रॅफीक विभागामार्फत आरएस गेडाम,शहर अभियंता महेश बारई, उप नगररचनाकार जयदीप मांडवगडे, उपअभियंता रवींद्र हजारे, डॉ. अमोल शेळके, संतोष गर्गेलवार उपस्थित होते.