राज्यावर आलेल्या संकटापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी अमरावती लोकसभा मतदार संघातील अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती अपक्ष आमदार रवी राणा सर्वत्र हनुमान चालीसा पठण करीत भगवंताकडे साकडे घालत आहे. महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांमुळे पिचल्या गेलेल्या सर्वसामान्यांचे ‘अच्छे दिन’ हनुमंताच्या आशिर्वादाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘व्हिजन’ राबवूनच येवू शकतात.राणा दाम्पत्याने त्यामुळे ‘हनुमान चालीसा’सह पंतप्रधानांचे ‘विकास मॉड्युल’ नागरिकांपर्यंत पोहचवावे,असे आवाहन भाजप नेते आनंद रेखी यांनी शनिवारी केले.
केंद्र सरकारने महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देणारे अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. इंधनावरील करात कपात केली आहे.उज्वला गॅस योजनाधारकांना २०० रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे.सर्वसामान्यांच्या हितासाठी पंतप्रधानांकडून इतरही उपाययोजना केल्या जात आहे. हे सर्व करीत असताना केंद्र सरकारच्या तिजोरीला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. असे असतानाही पंतप्रधानांनी महसुलाची तमा न बाळगता सर्वसामान्यांचे हित समोर ठेवून या उपाययोजना केल्या आहेत. हे सर्व निर्णय घेण्यासाठी कणखर नेतृत्वाच्या दृष्टीची आवश्यकता असते.