बियाणे /खतांच्या गुणवत्ता नियत्रंणासाठी व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन

बियाणे /खतांच्या गुणवत्ता नियत्रंणासाठी व शेतकऱ्यांच्या समस्या

सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन

Ø सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असणार कार्यरत

चंद्रपूर, दि. 26 मे : जिल्ह्यात 2022-23 चा खरीप हंगाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व कीटकनाशके मिळणे व त्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) स्थापन करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी बियाणे, खते व इतर बाबींचा काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांनी थेट नियंत्रण कक्षात तक्रार द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. नियंत्रण कक्ष सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कार्यरत असणार आहे.

बियाणे खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठ्याबाबत शेतकऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर अडचणी येतात. या अडचणींचा विचार करून अशा अडचणी ऑन कॉल व प्रत्यक्षरीत्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावरील नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) काम करणार आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे व कीटकनाशकांच्या येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींबाबत शेतकऱ्यांना यामधून तक्रार करता येणार आहे.

शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके यांची गुणवत्ता व इतर बाबी संदर्भात काही तक्रार/अडचण असल्यास नियंत्रण कक्षातील मोबाईल क्रमांक 8788574490 यावर सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत संपर्क करून आपले अडचणीचे समाधान करून घेता येणार आहे. तसेच आपली तक्रार देखील नोंदविता येणार आहे. जिल्हास्तरावरील नियंत्रण कक्ष कृषी विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे कार्यरत असणार आहे.

जे शेतकरी आर.आर.बीटी बियाण्याला बळी पडतात व त्यांच्याकडे बियाणाचे पक्के बिल नसल्यामुळे त्यांना नुकसान सहन करावे लागते त्यामुळे आर.आर.बीटीच्या संदर्भातील तक्रारीसुद्धा नियंत्रण कक्षात मांडता येणार आहे.

तरी, शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी व तक्रारी संदर्भात नियंत्रण कक्षाशी संपर्क करून आपली तक्रार नोंदवावी व असलेल्या अडचणीचे निराकरण करून घ्यावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे तसेच जिल्हा परीषदेचे कृषि विकास अधिकारी श्री. दोडके यांनी केले आहे.