त्या मायलेकीच्या मृत्यु प्रकरणी प्रशासनाचा दोष नाही

त्या मायलेकीच्या मृत्यु प्रकरणी प्रशासनाचा दोष नाही

चंद्रपूर, दि. 12 सप्टेंबर बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील काल मृत पावलेल्या झेलाबाई पोचू चौधरी आणि त्यांची मुलगी माया मारोती पुलगमकर यांच्या मृत्युप्रकरणी प्रशासनाचा दोष नाही, असे प्रत्यक्ष पाहणी दरम्यान निदर्शनास आल्याचे बल्लारपुरचे तहसीलदार संजय राईंचवार यांनी कळविले आहे.
मायलेकीच्या मृत्युप्रकरणी त्यांच्या निवासस्थानी बल्लारपुरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सुर्यवंशी आणि तहसीलदार संजय राईंचवार यांनी भेट देवून वास्तविक परिस्थिती जाणून घेतली. त्यांच्या भेटी दरम्यान प्रत्यक्षात असे निदर्शनास आले की, मृत दोघ्याही मायलेकी ह्या शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थी होत्या. त्यांना नियमाप्रमाणे मासिक पेंशन रुपये २०००/- चा लाभ दरमहा मिळत होता. तसेच त्यांना दरमहा स्वस्त धान्य दुकानदार यांचेकडून शासनाच्या पुरवठा विभागाच्या प्राधान्य कुटुंब लाभ योजनेअंतर्गत नियमित धान्य मिळत होते व त्यांनी ऑगस्ट महिन्याच्या धान्याची उचलसुध्दा केली आहे. तसेच कोठारी येथीलचं रहीवाशी सुरेश व्यंकय्या आवारीकर हे दररोज सकाळ संध्याकाळ दोन वेळचा जेवणाचा डबा मायलेकीला पोहोचवीत होते. परंतु प्रकृती अस्वास्थामूळे त्या नियमित जेवण करू शकत नव्हत्या. त्यामुळे अन्नपाण्याविना त्यांचा तडफडून मृत्यू झाला तसेच प्रशासनाच्या चुकीमूळे त्या मायलेकीचा मृत्यु झाला असे म्हणणे योग्य नाही. त्यांच्या मृत्यु प्रकरणात प्रशासनाची काहीही चूक झालेली नाही, असे तहसीलदार यांनी कळविले आहे.