1 ते 7 सप्टेंबरदरम्यान ‘मातृ वंदना’ सप्ताहाचे आयोजन Ø आतापर्यंत जिल्ह्यात 51 हजारांच्या वर प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेचा लाभ

1 ते 7 सप्टेंबरदरम्यान ‘मातृ वंदना’ सप्ताहाचे आयोजन

Ø आतापर्यंत जिल्ह्यात 51 हजारांच्या वर प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेचा लाभ

चंद्रपूर, दि. 31 ऑगस्ट : दि. 1 सप्टेंबर  ते 7 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत “मातृ वंदना सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे. स्तनदा माता व गर्भवती महिलांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले आहे.
 चंद्रपूर जिल्ह्यात या योजनेची प्रभावी व यशस्वीरित्या अंमलबजावणी सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 53 हजार 284 इतक्या लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 51 हजार 408 लाभार्थ्यांना एकूण 23 कोटी 71 लक्ष 2 हजार  रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.
भारतातील दारिद्रय  रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील अनेक व गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरीसाठी काम करावे लागते. तसेच प्रसूतीनंतर शारीरिक क्षमता नसतानांही मजुरीसाठी तात्काळ कामे करावी लागतात. त्यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही नवीन योजना संपूर्ण देशात दि. 1 जानेवारी 2017 पासून कार्यान्वित केली आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून शंभर दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर पहिला हप्ता एक हजार रुपये, किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेच्या सहा महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता दोन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केल्या जाईल. प्रसुतीनंतर झालेल्या अपत्याची जन्म नोंदणी व बालकाला पेन्टा तिसरे लसीकरण दिल्यानंतर तिसरा हप्ता रुपये 2 हजार लाभार्थ्यांच्या खात्यात  जमा केला जाईल.
ही योजना सर्व स्तरातील महिलांना लागू आहे, परंतु वेतनासह मातृत्व रजा घेणाऱ्या महिलांना ही योजना लागू राहणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे स्वतःचे आधार कार्ड, पतीचे आधार कार्ड, बँक खाते पासबुक, माता बाल संरक्षण कार्ड या कागदपत्रांची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील स्तनदा माता व गर्भवती महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले आहे.