पूर परिस्थितीत मदतीसाठी शासनाची संपूर्ण यंत्रणा उतरली

• नौदल, सैन्यदलाच्या तुकड्याही बचावकार्यात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने संपर्कात

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली. रायगड, ठाणे, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांमधील अनेक नद्या धोका पातळीवर वाहत असल्याने  एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल तसेच सैन्यदलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पूर परिस्थितीत मदत व बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तात्काळ उपाययोजना सुरू आहेत अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

तसेच पुणे विभागातील संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेवून सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुध्दा एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात येत आहे.रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर मार्फत मदत व बचावकार्य करण्यात येत आहे.

एनडीआरएफच्या २ तुकड्या कोल्हापूर जिल्ह्यात दाखल

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. पूरपरिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या 2 तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. एक तुकडी शिरोळ तालुक्यात तर दुसरी तुकडी करवीर तालुक्यात पोहोचली आहे. आयआरबी बोट, गोताखोर सेट, लाईफ जॅकेट, रेस्क्यू रोप आदी अत्याधुनिक साधनांसह प्रत्येकी २५ जवानांची २ पथके सज्ज झाली आहेत.