दोन गावांत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही मनरेगाचा लाभ देण्यासाठी प्रयत्न – मंत्री भरत गोगावले

दोन गावांत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही मनरेगाचा लाभ देण्यासाठी प्रयत्न – मंत्री भरत गोगावले

मुंबई, दि.२५ : राज्यात दोन वेगवेगळ्या गावांमध्ये जमीन असलेल्या शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत लाभ देण्याबाबत शासन सकारात्मक असून, संबंधित नियमांच्या चौकटीत सर्व लाभधारकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी  माहिती रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभेत दिली.

राज्यात दोन वेगवेगळ्या गावांमध्ये जमिनी असलेल्या शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनांचा लाभ मिळण्याबाबतचा प्रश्न सदस्य विक्रम पाचपुते यांनी मांडला.

रोहयो मंत्री भरत गोगावले म्हणाले की, मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड एका गावाचे असले तरी ठराविक अटींनुसार दुसऱ्या गावात वैयक्तिक कामांचा लाभ दिला जाऊ शकतो. मात्र, यासाठी साधारणपणे ५ किमी अंतर किंवा संबंधित तालुक्याच्या मर्यादेतच कामे दिली जातात. दुसऱ्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात जमीन असल्यास सध्या नियमांमुळे अडचणी येतात.

या संदर्भात केंद्र शासनाच्या अटी व शर्तींचा विचार करून आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत शासन पातळीवर विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, ज्या ठिकाणी लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत, त्या प्रकरणांची माहिती मिळाल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करून योग्य तो मार्ग काढण्यात येईल, असेही मंत्री गोगावले यांनी सांगितले.

‘मनरेगा’ अंतर्गत प्रामुख्याने अल्पभूधारकांना वैयक्तिक कामांचा लाभ दिला जातो. काही ठिकाणी मंजूर कामांपैकी काहीच कामे प्रत्यक्षात सुरू असून उर्वरित प्रलंबित राहतात, याचीही दखल घेऊन कामांच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश देण्यात येतील, असे मंत्री गोगावले यांनी नमूद केले.