विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प उभारण्याचा शासनाचा विचार – वनमंत्री गणेश नाईक
मुंबई, दि. २५ : विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प उभारण्याचा विचार असून, स्थानिक पातळीवरून मागणी आल्यास त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल. वाघांचे संरक्षण आणि मानवांचे रक्षण या दोन्ही गोष्टी समान महत्त्वाच्या आहेत असे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत सांगितले.
याबाबत सदस्य नानाभाऊ पटोले यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, चंद्रपूर वन विभागाचे क्षेत्र सुमारे २७५१ चौ.कि.मी. असून मध्य चांदा व ब्रम्हपुरी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाघांचे अस्तित्व आहे. मात्र गेल्या पाच ते सात वर्षांत वाघांची संख्या १०० वरून ४५० पर्यंत वाढली आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प उभारण्याचा विचार असून, स्थानिक पातळीवरून मागणी आल्यास त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल. मात्र शहरी व अत्याधुनिक भागात असे प्रकल्प उभारणे शक्य नाही. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू होत असलेल्या अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वनविभाग सतर्क असून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या माध्यमातून संयुक्त वनव्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, चंद्रपूर व राज्यातील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष हा केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठीचा विषय आहे. वाघ व बिबटे या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना उपचारासाठी विशेष केंद्रे उभारण्यात आली असून, तिथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जात आहेत. संयुक्त वन व्यवस्थापनाद्वारे स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.भविष्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खान्देश या भागांमध्येही व्याघ्र प्रकल्प व सफारी सुरू करण्याचा मानस व्यक्त करताना, वनविभागाचा सविस्तर आराखडा (डीपीआर) लवकरच सभागृहासमोर मांडण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
या चर्चेत सदस्य नानाभाऊ पटोले, कृष्णा खोपडे, विकास ठाकरे, राजेश पाडवी, सुलभा खोडके, रामदास मसराम, सरोज अहिरे यांनी सहभाग घेत विविध मुद्दे उपस्थित केले.







