पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आमंत्रित

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आमंत्रित

          भंडारा,दि.11:- केंद्र शासनाच्या सुक्ष्म तसेच मध्यम उद्योग मंत्रालयाअंतर्गत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागात 2020-21 या आर्थिक वर्षात 25 लाख प्रकल्प मर्यादेपर्यंत उद्योग उभारण्यासाठी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरूण उद्योजकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील तरुण वर्ग व पारंपारिक कारागिरांना एकत्रित करुन स्थानिक पातळीवर स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे. खेड्याकडून शहराकडे येणाऱ्या बेरोजगारांचे व पारंपारिक कारागिरांचे स्थलांतर थांबविणे व ग्रामीण भागात रोजगार वाढीस मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेअंतर्गत उत्पादन प्रक्रिया उद्योगासाठी जास्तीत जास्त 25 लाख व व्यवसाय व सेवा उद्योगाकरिता 10 लाखांची मर्यादा आहे. ग्रामीण भागासाठी प्रकल्प किंमतीच्या 25 व 35 टक्के रक्कम मार्जिन मनी (अनुदान) स्वरुपात देण्यात येते. उत्पादन प्रक्रिया असलेल्या प्रकल्पामध्ये प्रकल्प किंमत 10 लाखापेक्षा जास्त असल्यास तसेच सेवा उद्योगासाठी प्रकल्प किंमत 5 लाख असल्यास शैक्षणिक पात्रता आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाचे किमान वय 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक असून अर्जदाराने केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. केवळ नवीन उद्योजक, कारागीर संस्था व बचत गट या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचे अर्ज ऑनलाईन स्विकारले जात असून www.kviconline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज व योजनेची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. या योजनेचा अर्ज तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत दुरध्वनी क्रमांक 07184-252521 वर जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जांभूळकर निवास, बाबा मस्तानशहा वार्ड, भंडारा या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सी.बी. देविपुत्र यांनी केले आहे.