शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणे खपवून घेतले जाणार नाही –खा धानोरकर

 चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील एकोना गावातील शेतकऱ्यांच्या शेती वर्धा नदी पलीकडे आहे. या नदीवरील बंधाऱ्यामुळे त्यांना शेत या करता येत नाही ,त्यामुळे शेती करण्याकरिता पूर्ण सुविधा उपलब्ध करून द्या. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे मी गय करणार नाही असे खडे बोल खा बाळू धानोरकर यांनी मंगळवार ला विश्रामगृहात आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले.
 या बैठकीला आ प्रतिभा धानोरकर, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, औद्योगिक महामंडळाचे कार्यकारी अभियंता बुराडे, जी एम आर चे विनोद पुसदकर, वर्धा पॉवर कंपनीचे दिलीप जोशी उपस्थित होते.
 वरोरा तालुक्यातील एकोना व मार्डा गावातील 40 शेतकऱ्यांच्या शेती वर्धा नदी पलीकडे यवतमाळ जिल्ह्यात आहे . मार्डा गावानजीक वर्धा नदीवर औद्योगिक महामंडळाने सिमेंट कॉंक्रिटचा बंधारा बांधला. या बंधाऱ्यातील पाणी औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांना बारा महिने दिले जाते. सध्या बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे. पाणी ओलांडतांना जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने शेती पडीत राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे .शेती पडीत झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल याकरिता खा बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. औद्योगिक महामंडळ व
कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नये ,नदीपलीकडील शेतकऱ्यांकरिता ट्रॅक्टर व शेतीची अवजारे उपलब्ध करून द्यावी, त्यांच्याकरिता बोटींची व्यवस्था तातडीने करावी आदी निर्देश खासदार धानोरकर यांनी देत या हंगामात शेतकऱ्यांना शेती करता यावी याकरिता सर्व उपाययोजना शीघ्र गतीने करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष मिलिंद भोयर ,प्रमोद मगरे तसेच एकोना आणि मार्डा येथील शेतकरी उपस्थित होते .