लसीकरण जनजागृती मोहिमेचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ Ø हिरवी झेंडी दाखवून चित्ररथ रवाना

लसीकरण जनजागृती मोहिमेचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ

Ø हिरवी झेंडी दाखवून चित्ररथ रवाना

चंद्रपूर,दि. 7 जुलै : कोरोनाविरुध्दच्या लढाईत ‘कोव्हीड – 19 प्रतिबंधात्मक लस’ हे एक प्रभावी शस्त्र आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याला जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले असून लसीकरणासंदर्भात नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, कोविड-19 लसीकरणाबाबत जनतेमध्ये असलेले गैरसमज दूर करून जनजागृती व प्रबोधन करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी संबंधित तालुकास्तरीय, ग्रामस्तरीय समित्यांनी सक्रीय व्हावे. स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच लसीकरण झालेल्या मान्यवरांची मदत घेऊन इतरांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे. नागरिकांनीही लसीकरणाबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. लस पूर्णपणे सुरक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून लसीकरण जनजागृती पोस्टर्सचे अनावरण करण्यात आले. या मोहिमेदरम्यान चित्ररथ, पोस्टर्स, स्टीकरशीट, जिंगल्स, हँडबील आदींच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

लसीकरणबाबत असा आहे जनजागृतीपर संदेश : कोव्हीड – 19 लस ऑनलाईन नोंदणी पध्दतीने तसेच ‘ऑन दी स्पॉट’ उपलब्ध्, 18 वर्षांवरील सर्वांना शासकीय लसीकरण केंद्रात मोफत लस, स्तनदा मातासुध्दा लस घेण्यासाठी पात्र, मासिक पाळी असली तरी लस घेता येते, उच्च रक्तदाब, किडणीचे आजार, मधूमेह, कॅन्सर व सहव्याधी असणा-यांनी प्राधान्याने लस घ्यावी, कोव्हीडमधून पूर्णपणे बरे झालेल्या व्यक्ती तीन महिन्यांनी लस घेण्यासाठी पात्र, लस घेतल्यानंतर 15 दिवसांनी रक्तदानसुध्दा करता येते, ‘लसीकरणानंतर दोन वर्षांनी मृत्यु’ ही निव्वळ अफवा, ‘लसीकरणामुळे अपत्य प्राप्ती होत नाही’, ही सुध्दा अफवाच. कोणत्याही प्रकारचे वंधत्व येत नाही, कोव्हीड – 19 लस पूर्णपणे सुरक्षित आहे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, लस घेतल्यानंतर ताप येणे, अंगदुखी होणे, ही एक नैसर्गिक प्रकिया. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचा एक भाग. त्यामुळे घाबरू नका, लसीकरणानंतर नियमित मास्कचा वापर, साबणाने हात स्वच्छ धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर राखणे आदी नियमांचे पालन आवश्यक.