मुख्यमंत्री साधतील कृषी विभागाच्या रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांशी संवाद Ø शेतक-यांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

मुख्यमंत्री साधतील कृषी विभागाच्या

रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांशी संवाद

Ø शेतक-यांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

चंद्रपूर दि. 30 जून : खरीप हंगाम 2021 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महत्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन दि.21 जून ते 1 जुलै 2021 या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम यशस्वीपणे पार पडत आहे. दि. 1 जुलै 2021 रोजी हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या कृषी दिनी कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप आहे.

               नुकतेच कृषी विभागामार्फत सन 2020 च्या रब्बी हंगामाचे रब्बी ज्वारी, गहू, हरभरा आणि करडई या पिकांसाठी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीचे पीकस्पर्धेचे विजेते जाहीर करण्यात आले. दि. 1 जुलै 2021 रोजी मुंबई येथे दुपारी 12 वाजता मंत्रालय, मुंबई येथे होणाऱ्या कृषी दिन कार्यक्रमामध्ये राज्यस्तरीय रब्बी हंगाम 2020 मधील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते सत्कार होणार आहे.

               सदर कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसुलमंत्री, कृषीमंत्री, फलोत्पादन मंत्री, कृषी राज्यमंत्री, फलोत्पादन राज्यमंत्री, सचिव (कृषी) आणि आयुक्त (कृषी) यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. तसेच सदर कार्यक्रमांच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कृषी विभागाच्या रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाचे यु-टयुब चॅनल        www.youtube.com/c/AgricultureDepartmentGom या लिंकवरुन होणार असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.