मीटर काढुन पाण्याचा वापर करणाऱ्या नळधारकांवर मनपाची कारवाई 28 टिल्लू पंप जप्त
चंद्रपूर 17 जुलै – नळावरील मीटर काढुन पाण्याचा वापर करणाऱ्या व टिल्लु पंपद्वारे पाण्याचा गैरवापर करणाऱ्या 28 नळ जोडणीधारकांवर चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली असुन त्यांचे नळ कनेक्शन खंडीत करून दंड ठोठाविण्यात आला आहे. दंड न भरल्यास सदर नळजोडणी धारकांना काळ्या यादीत टाकल्या जाणार आहे.
चंद्रपूर मनपा पाणीपुरवठा विभागाने अभियंत्यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात प्रत्येकी 7 कर्मचाऱ्यांच्या 3 टीम बनविल्या असुन या टीमद्वारे सलग 4 दिवस कारवाई करून सिस्टर कॉलनी परिसरातील ज्ञानेश्वर चिमुरकर,विजय कांबळे,जमुनादास मुन,भाऊराव बेंदले यांच्या घरून 4,तुकूम मातोश्री शाळा परिसरातील रविन्द्र हजारे,जमीर खान,तिवारी,झाडे,वांढरे यांच्या इथे 5,सिस्टर कॉलनीतील सोनकुसरे,पाटील,देविदास उपरे,सिध्दीकी,चिवंडे यांच्या घरून 5, समाधी वार्ड येथील वसंत झाडे, राजु हिवरे,राजेन्द्र टिपले,राजु वानखेडे येथील 6,उत्तम नगर येथीलचंदन पाल,हेमराज धात्रक,बबन नवघरे,नाग बिश्वास यांच्या घरून 8 असे एकुण 28 टिल्लू पंप जप्त केले आहेत.
मनपातर्फे शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक ( मीटर ) लावण्यात आले असुन मीटरचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे. कारवाई दरम्यान सदर नळधारकांद्वारे नळ जोडणीवर लावलेले जलमापक (मीटर) काढुन टाकणे तसेच टिल्लू पंप लावुन पाण्याचा अनावश्यक उपसा केला जात असल्याचे मनपा पथकास पाहणी दरम्यान आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून जप्ती करण्यात आली आहे.
सर्व नळ जोडणींवर मनपाद्वारे मीटर लावण्यात आले असल्याने पाण्याचा जेवढा वापर होईल तेवढेच देयक येत असुन अनावश्यक खर्च व अनावश्यक पाण्याच्या वापरावर नियंत्रण आले आहे.मात्र काही नागरिक नळाचे देयक कमी करण्याच्या दृष्टीने मीटरला लागुन असलेला पाईप काढतात ज्यामुळे पाण्याचा वापर करतांना मीटर बंद असते व बिल अतिशय कमी येते,शिवाय टिल्लु पंप द्वारे मोठ्या प्रमाणात पाणी एकाच कनेक्शनवर ओढले जाऊन इतर नळधारकांना अतिशय कमी प्रमाणात पाणी पुरवठा होतो.
त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम लक्षात घेता मनपातर्फे टिल्लू पंप लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली असुन नळावरील मीटर काढल्यास अथवा विद्युत पंप/ टिल्लू पंप लावला असल्याचे आढळल्यास मनपाच्या जप्ती पथकांद्वारे कारवाई केली जात आहे.