राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्यातील अन्नधान्य वाटपाबाबत

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्यातील अन्नधान्य वाटपाबाबत

 

गडचिरोली,दि.14: गडचिरोली जिल्हयातील सर्व रेशनकार्डधारकांना सुचित करण्यात येते की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत माहे ऑक्टोबर-२०२२ करिता अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना गहू, तांदूळ व साखरेचे नियतन व वाटप परिमाण निश्चित करण्यात आलेले आहे.

अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रती शिधापत्रिका 30 किलो तांदुळ रुपये 3 प्रति किलो प्रमाणे, गहू 5 किलो २ रुपये प्रति किलो प्रमाणे, तर १ किलो साखर २० रुपये प्रति किलो प्रमाणे. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना प्रती व्यक्ती 4 किलो तांदुळ ३ रुपये प्रति किलो प्रमाणे, 1 किलो गहू २ रुपये प्रति किलो प्रमाणे.

कोविड-19 प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांसाठी माहे ऑक्टोबर, 2022 ते डिसेंबर, 2022 करिता राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरीक्त प्रतिसदस्य प्रतिमाह 5 किलो अन्नधान्याचे (गहू व तांदूळ) “मोफत” वाटप करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने सदरहु योजनेतील माहे ऑक्टोबर, 2022 करिता धान्याचे वितरण मंजूर केरण्यात आलेले आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्नयोजनेतील व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना अगामी दिवाळी सणानिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या 4 शिधाजिन्नसांचा समावेश असलेला 1 शिधाजिन्नस संच (दिवाळी पॅकेज) प्रतिशिधापत्रिका रु.100/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने ई-पॉस प्रणालीव्दारे माहे ऑक्टोबर, 2022 करिता वाटप करण्यात येत आहे.

तरी सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना सुचित करण्यात येत की, त्यांना नेमून दिलेल्या रास्तभाव धान्य दुकानात जावून आपले शिधापत्रिकेवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील माहे ऑक्टोबर, 2022 महिन्यातील नियमित देय असलेल्या संपूर्ण अन्नधान्याची उचल करावी. व धान्य घेतेवेळी POS मशीन मधून निघणारे बिल घेवून, बिल पावतीवर नमूद असलेली रक्कम देण्यात यावी. व सोबतच नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील देय असलेल्या संपूर्ण अन्नधान्याची “मोफत” उचल करावी. दुकानात एकाच वेळी गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे. असे जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.