पीकस्‍पर्धा रब्‍बी हंगाम 2022 स्पर्धेकरिता 31 डिसेंबर 2022 पर्यंत सहभाग नोंदवावा

पीकस्‍पर्धा रब्‍बी हंगाम 2022 स्पर्धेकरिता 31 डिसेंबर 2022 पर्यंत सहभाग नोंदवावा

 

भंडारा, दि. 23: राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अश्‍या प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्‍ती व मनोबलामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

 

पीकस्पर्धेतील पीके

 

रब्बी पीके- ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस पीकस्पर्धेतील पिकाची निवड करताना त्या पिकाचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान 1000 हेक्टर असावे. तथापि संबंधित पिकाखालील क्षेत्र 1000 हेक्टर पेक्षा कमी असल्यास व स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांची विहीत मार्गाने लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.

 

स्पर्धक संख्या, पीकस्पर्धा क्षेत्र, कापणी प्रयोग

 

पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे स्वतःच्या शेतावर त्यापीकाखाली भात पिकासाठी किमान 20 आर व इतर पिकासाठी 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

 

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क

 

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पीकनिहाय (प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र) रक्कम 300 रुपये राहील. तालुकास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी सर्वसाधारण गटासाठी किमान 10 व आदिवासी गटासाठी किमान 5 यापेक्षा प्रवेश अर्ज कमी असल्यास, पिकस्पर्धा रद्द करण्यात येऊन प्रवेश शुल्क परत देण्यांत येईल.

 

अर्ज दाखल करण्याची तारीख

 

ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पिकासाठी 31 डिसेंबर 2022 आहे. अर्ज दाखल करण्‍याच्‍या तारखेच्‍या दिवशी शासकीय सुट्टी असल्‍यास, त्‍यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्‍यात येईल.

 

तालुकास्तर ,जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील. या पद्धतीने पिकस्पर्धा घ्यावयाचे हे प्रथम वर्ष असल्याने प्रथम फक्त तालुकास्तरीय व जिल्‍हास्‍तरीय पीकस्पर्धा घेण्यात येईल. राज्यपातळीवरील पिकस्पर्धा चालुवर्षी होणार नाहीत. मागील वर्षाच्‍या तालुकास्‍तरीय स्‍पर्धेतील पिकनिहाय पहिल्‍या तीन क्रमांकाच्‍या विजेत्‍या शेतकऱ्यांनी जिल्‍हास्‍तरीय पिकस्‍पर्धेमध्‍ये सहभाग घ्‍यावा.

 

बक्षिस स्वरुप

 

तालुकास्तरीय सर्व साधारण व आदिवासी गट बक्षिस प्रथम 5 हजार, द्वितीय 3 हजार व तृतीय 2 हजार रूपये तर जिल्हास्तरीय प्रथम 10 हजार, द्वितीय 7 हजार व तृतीय 5 हजार रूपये राहणार आहेत. रब्बी हंगाम- दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होणे आवश्यक आहे, ही बाब विचारात घेऊन पिकस्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा यांनी केले आहे.