वखार महामंडळाच्या गोदामात शेतमालाची साठवणूक करून सोयीसुविधा व सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन

वखार महामंडळाच्या गोदामात शेतमालाची साठवणूक करून सोयीसुविधा व सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन

 

चंद्रपूर, दि. : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक उपक्रम आहे. राज्यभरात गोदामांचे जाळे निर्माण करून औद्योगिक व कृषी क्षेत्रास अन्नधान्याचे नासाडी होऊ नये, म्हणून साठवणुकीची सुविधा पुरविण्यासाठी 8 ऑगस्ट 1957 रोजी वखार महामंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. महामंडळाद्वारे शेतमाल तसेच शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, किटकनाशके याची शास्त्रोक्त पद्धतीने सुरक्षित साठवणूक करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाते. महामंडळाची मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद व लातूर हे 8 विभाग आहेत. राज्यातील महामंडळाची एकूण 205 वखार केंद्रावर 120 गोदामांची एकूण साठवणूक क्षमता 21.15 लाख मे. टन इतकी आहे. महामंडळाच्या नागपूर विभागात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा हे जिल्हे असून याअंतर्गत एकूण 19 वखारकेंद्रावर 110 गोदामे आहेत त्यांची साठवणूक क्षमता 1.96 मे. टन इतकी आहे.

 

शेतमाल उत्पादनाबरोबरच शेतमालाची सुरक्षित साठवणूक व त्याची विक्री व्यवस्थापन देखील महत्त्वाचे आहे. सुगी हंगामाच्या वेळी बाजारपेठेत शेतमालाची आवक जास्त होत असल्याने शेतकऱ्यांना कमी दरात शेतमालाची विक्री करावी लागते. अशावेळेस कृषी मालाच्या साठवणुकीस प्राधान्य देऊन महामंडळ राज्यातील सर्व ठिकाणच्या गोदामामध्ये या हंगामात नियोजन करीत आहे. महामंडळाच्या सर्व गोदामामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने शेती औद्योगिक मालाची साठवण केली जाते. ठेवीदारांना दिलेली महामंडळाची वखार पावती परक्राम्य लेख असल्याने ती बँकेकडे तारण ठेवल्यास ठेवीदारांना बँकेकडून त्वरित कर्ज उपलब्ध होते. त्याआधारे शेतकऱ्यांना हंगामात अर्थसहाय्य व नंतर बाजारभाव येईपर्यंत गोदामात साठवणुकीची सोय मिळते. शेतकऱ्यांनी चालू पिकाचा 7/12 उतारा दिल्यानंतर वखार भाड्यात प्रचलित साठवण दराच्या 50 टक्के सवलत देऊन 25 टक्के जागा आरक्षित करण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक पंधरवाड्यामध्ये किड प्रतिबंधात्मक व दर तीन महिन्यांनी उपचारात्मक किटकनाशकांचा वापर करून माल सुरक्षित ठेवण्यात येतो. साठवणुकीस असलेल्या सर्व मालाचा 100 टक्के विमा संरक्षण दिल्या जाते. त्यामुळे नुकसान झाल्यास योग्य ती भरपाई दिल्या जाते.

 

याशिवाय वखार महामंडळ व महाराष्ट्र सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याकरीता अभिनव ऑनलाइन तारण कर्ज योजना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पात्र शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपनी यांना वखार पावतीवरील शेतमालाच्या किंमतीच्या 70 टक्के कर्ज बँकेकडून संबंधितांच्या खात्यात आरटीजीएस अथवा एनईएफटी द्वारे जमा करण्यात येते. सदर तारण कर्जाचा व्याजदर 9 टक्के असून इतर बँकेच्या तुलनेत सर्वात कमी आहे. तारण कर्जाची मर्यादा 10 लाख प्रती शेतकरी व 75 लाख प्रती शेतकरी उत्पादक कंपनी इतकी आहे. महामंडळाच्या गोदामात साठवणुकीस ठेवण्यात येणाऱ्या शेतमालाच्या वखार पावती वर ऑनलाइन तात्काळ कर्ज उपलब्ध होत असल्याने संबंधित शेतकरी/ठेवीदार यांची वेळेची बचत होऊन कागदपत्रासाठींच्या प्रवास खर्चात बचत होण्यास मदत होते. शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या सुविधांचा लाभ सुगीच्या काळात व्यापाऱ्यांना माल न विकता तो वखार महामंडळाच्या गोदामात ठेवावा.

 

चंद्रपूर येथील एमआयडीसी एरिया, प्लॉट क्र. ब-35, घुग्गुस रोड येथे वखार केंद्र असून 10 गोदामांची साठवणूक क्षमता 19750 मे. टन एवढी आहे. तरी, या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे साठा अधिक्षक एन. एम. बुटले यांनी केले आहे.