शास्त्रशुद्ध बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष सिद्ध होऊ शकते : सुधीर मुनगंटीवार 

शास्त्रशुद्ध बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष सिद्ध होऊ शकते : सुधीर मुनगंटीवार 

नागपूर येथील अॅग्रोविजन कार्यक्रमात ना. मुनगंटीवारांचे मार्गदर्शन

विकासाचे प्रणेते, दुरदृष्‍टी असणारे लोकप्रिय नेते केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्‍या प्रेरणेतून गेल्‍या काही वर्षांपासून सुरु असलेल्‍या अॅग्रोविजन या कार्यक्रमात महाराष्‍ट्राचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थिती दर्शवुन मार्गदर्शन केले.

 

बांबु उत्‍पादनातुन उत्‍पन्‍नाच्‍या संधी या सत्रात मार्गदर्शन करताना ना. मुनगंटीवार म्‍हणाले की मी लहानपणापासून अनेक झाडांबद्दल एैकत होतो. त्‍यात कल्‍पवृक्षाचा ही समावेश होता. परंतु पुढे वनमंत्री झाल्‍यावर अशा प्रकारचे काही झाड आहे का अशी विचारणा केली असता तसे झाड उपलब्‍ध नसल्‍याचे अधिका-यांनी सांगीतले. परंतु वनमंत्री झाल्‍यावर बांबुचा अभ्‍यास केला आणि लक्षात आले बांबु म्हणजेच आधुनिक कल्‍पवृक्ष . बांबुमुळे अन्न, वस्त्र,निवारा या व अशा अनेक गरजा पूर्ण होतात. बांबु चे पहिले पिक तीन वर्ष घेता येते. परंतु त्‍यानंतर ४० ते ८० वर्षेपर्यंत हाच बांबु आपल्‍याला सतत उत्‍पन्‍न देत राहतो. बांबु पासून दरवर्षी एकरी अंदाजे दीड लाख रुपयापर्यंतचे उत्‍पन्‍न अतिशय अल्‍पखर्चात मिळु शकते. तसेच बांबु पासून अनेक वस्‍तु तयार होत असल्‍याने त्‍याच्‍या विक्रीची चिंता बांबु लावणा-याला नसते.

 

ना. नितीनजी गडकरी यांनी जेव्‍हा हे सांगीतले बांबुमध्‍ये चिन व व्हियतनाम हे देश भारतापेक्षा पुढे आहेत. तेव्‍हा हा विषय गंभीरपणे घेवुन मी वनमंत्री म्‍हणून सात दिवसात बांबु डेव्‍हलपमेंट बोर्ड तयार केला व जुने जाचक नियम बदलुन नियमांमध्‍ये सहजता आणण्‍याचा प्रयत्‍न केला व त्‍याचाच परिणाम म्‍हणून महाराष्‍ट्रात बांबुची वाढ ४,४६२ स्‍क्‍वेअर किमी. ने झाली. जी देशात सर्वाधिक होती. चंद्रपूरात बांबु संशोधन प्रकल्‍पाची ३० हजार स्‍क्‍वेअर फुटमध्‍ये चार मजली इमारत झाली जी पुर्णपणे बांबुची आहे.

 

या सत्रात बांबु तज्ञ माजी आ. पाशा पटेल, डॉ. पंजाबराव देशमुख, कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरदराव गडाख, बांबु डेव्‍हलपमेंट बोर्डाचे व्‍यवस्‍थापीक संचालक, श्रीनिवास राव, सल्‍लागार समितीचे अध्‍यक्ष डॉ. सी.डी. मायी, अॅग्रोविजनचे आयोजक सुधीर दिवे, सचिव रवी बोरडकर हे उपस्थित होते. यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार म्‍हणाले, काही वर्षांपूर्वी जेव्‍हा पाशा पटेल मला भेटावयाला आले तेव्‍हा बांबु विषयी ते अतिशय पोटतिडकीने बोलत होते. आज मात्र पाशाजी बांबु तज्ञ झाले यावरुन त्‍यांची या विषयावरची निष्‍ठा दिसून येते. पुढील काळात वनविभाग, जलसंधारण विभाग व मनरेगा यांची संयुक्‍त बैठक घेवुन रस्‍त्‍याच्‍या कडेने व तलावाच्‍या भोवताल बांबु ची लागवड कशी करता येईल यावर चर्चा करु. मेळघाट मध्‍ये बांबुपासून घरे सुध्‍दा तयार झाली आहेत. उर्जा विभागाने एक शासकीय परिपत्रक काढले असुन ज्‍यामध्‍ये जिथे जिथे कोळसा जाळण्‍यासाठी उपकरणे आहेत तिथे पाच टक्‍के बायोमास किंवा बांबु पासून तयार झालेले पॅलेट्स वापरण्‍यास परवानगी दिली आहे. त्‍यामुळे बांबु उत्‍पादन वाढविण्‍यास प्रोत्‍साहन मिळेल. बांबु पासून डिझेल बनविण्‍याच्‍या प्रकल्‍पावर मी मागील काळात कंपन्‍यांशी चर्चा केली होती. परंतु गेल्‍या अडीच वर्षात सर्व काही ठप्‍प होते. आता पुन्‍हा ती प्रक्रिया सुरु करणार आहे.

 

ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍पात प्‍लॉस्‍टीक बाटली ऐवजी काचेची बाटली देण्‍याची पध्‍दत सुरु केली आहे. त्‍या बाटलीला बांबुचे कव्‍हर तयार करुन त्‍यावर क्‍युआर कोड लावण्‍याचे निर्देश मी दिले आहेत. ज्‍यामुळे बांबु बद्दलची सर्व माहीती पर्यटकांना मिळेल. पंजाबराव कृषि विद्यापीठात टिशु कल्‍चर करिता अत्‍याधूनिक प्रयोग शाळा सुरु करण्‍याची मागणी करण्‍यात आली आहे. यावर विचार करुन प्रयोग शाळा लवकर सुरु करण्‍यासाठी प्रयत्‍न करेन. याप्रसंगी सर्व मान्‍यवरांचे यथोचित मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचे संचालन सौ. रेणुका देशकर यांनी केले.